Vijay Wadettiwar’s criticism on Ajit Pawar : महिला सुरक्षेसाठी ५००० कोटींची तरतूद करावी
Mumbai : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना आता सुरक्षेसाठी झगडावं लागत आहे, अशा वेळी महिला सुरक्षेसाठी तुटपुंजी तरतूद सरकारने केली. यावर काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली.
पुणे बस स्थानकात महिलेवर अत्याचार झाला. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली. जर महिला सगळीकडे असुरक्षित असतील, तर मग सुरक्षित कोण? NCRB ची आकडेवारी सांगते की, महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण दिवसाला १२६ गुन्हे नोंदवले जातात. तर बालकांविरोधात दररोज ५५ गुन्ह्यांची नोंद होते. दरवर्षी ६४ हजार महिला महाराष्ट्रातून गायब होतात, त्यांचे काय होते? अशी स्थिती असताना निर्भया योजने अंतर्गत महिला मदत कक्षाच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद केली आहे.
Vijay Wadettiwar : वडेट्टीवार संतापले; म्हणाले, हमीभाव खड्ड्यात गेला का?
या सरकारला निर्भया फंडचा विसर पडला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते असताना निर्भया फंडचा गैरवापर शिंदे गटाने केला, तेव्हा टीका केली होती, आज अजित दादा यांनाच निर्भया फंडचा विसर पडला आहे. अर्थसंकल्पात महिला सुरक्षेचा उपाययोजनासाठी ८ हजार रुपये दिले आहेत, एक मंत्र्यांच्या कार्यालयात चहा नाश्त्यासाठी याहून अधिक खर्च होतो, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. त्यामुळे महिला सुरक्षेसाठी ५००० कोटीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवर यांनी केली.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ हजार महिला पोलिसांची भरती करणार, अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले? महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणावा, अशीही मागणी वडेट्टीवार यांनी केली.