bacchu-kadu-join-shivsena-eknath-shinde-maharashtra-politics-breaking : शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडत असून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. “मी शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय,” असे स्पष्ट करत कडूंनी आपल्या भूमिकेची घोषणा केली.
माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत झालेल्या चर्चांमध्ये त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे शिवसेनेकडून मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या कामात कोणतीही तडजोड होणार नसून शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी पूर्वीप्रमाणेच लढा सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Sunetra Pawar, praful patel: राष्ट्रवादीत वादाची ठिणगी: प्रफुल्ल पटेलांना सुनेत्रा पवारांचा दणका!
कडूंनी यावेळी शेतकरी धोरणांवरही भाष्य केले. पेरणीपासून कापणीपर्यंतच्या प्रक्रियेत सुधारणा, हमीभावात आवश्यक बदल, तसेच विविध योजनांमधील त्रुटी दूर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. “दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभारण्यात आले, मात्र त्याचे बळकटीकरण झाले नाही. ते अधिक सक्षम व्हायला हवे,” असे सांगत त्यांनी सरकारकडून ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली.
“शिवसेनेची राजकीय ताकद वाढवण्यासाठी माझ्या शरीरातील प्रत्येक थेंब काम करेल, पण शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर कोणताही समझोता होणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना स्वतंत्रपणे कार्यरत राहतील, मात्र राजकीयदृष्ट्या शिवसेनेसोबत पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या निर्णयामुळे राज्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून विशेषतः ग्रामीण आणि सामाजिक मुद्द्यांवर सक्रिय असलेल्या बच्चू कडूंच्या या भूमिकेमुळे शिवसेनेला बळकटी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








