devendra-fadnavis-praises-pm-narendra-modi-over-global-conflict-role-strait-of-hormuz : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
Nagpur: आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगातील संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये असल्याचे मत अमेरिकेतील नेतेही व्यक्त करत असल्याचे सांगितले. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हा सागरी मार्ग सध्या जगातील सर्वात संवेदनशील आणि धोकादायक क्षेत्रांपैकी एक बनला आहे. या मार्गावर इराणने आपले नियंत्रण अधिक मजबूत केले असून अमेरिकेच्या वाढत्या लष्करी हालचालींमुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे एक जहाज या मार्गातून सुरक्षितपणे येत असल्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीबाबत अधिकृत भूमिका केंद्र सरकारकडून मांडली जाईल, असे सांगताना फडणवीस म्हणाले की काही लोकांनी पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र आज मोदी यांनी आपल्या कृतीतून त्या शंकांना उत्तर दिले आहे. अमेरिकेतील काही नेतेही असे म्हणत आहेत की जागतिक संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदी यांच्या नेतृत्वात आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्ट्रेट ऑफ होर्मुझ या महत्त्वाच्या सागरी मार्गावर इराणने पूर्णपणे बंदी घातलेली नसली तरी त्यांनी काही अटी घालून जहाजांना परवानगी देण्याची भूमिका घेतली असल्याचे सांगितले जात आहे. इराण आपल्या अटी मान्य करणाऱ्या तसेच मित्रराष्ट्रांच्या जहाजांनाच या मार्गातून जाण्याची परवानगी देत असल्याची माहिती समोर येत आहे. भारताने आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर इराणसोबत यशस्वी चर्चा केल्यामुळे भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
Devendra Fadnavis : दावोसमध्ये करार, विदर्भात भूमिपूजन! तीन मोठे प्रकल्प आले
दरम्यान, आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतातील इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाल्याचेही दिसून येत आहे. काही ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.
गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या रांगा या प्रत्यक्ष तुटवड्यामुळे नसून काँग्रेस नेत्यांनी लोकांमध्ये निर्माण केलेल्या भीतीमुळे असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की घरगुती गॅस, पेट्रोल किंवा डिझेल यांचा कोणताही तुटवडा नाही आणि रेशनिंगही लागू केलेले नाही. तरीदेखील लोकांमध्ये घबराट निर्माण करून रांगा लावण्याचे षडयंत्र काँग्रेसकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
rohini khadse : वि’चित्रा’ताई, २५ दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?
या आरोपांबाबत पुरावे विचारण्यात आल्यानंतर फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांची विधानेच पुरावा असल्याचे सांगितले. राहुल गांधी, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांसारखे नेते लोकांमध्ये भीती निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे देशातील राजकीय नेत्यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जबाबदारीने वागावे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
__








