Solar power project launched on Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
Mumbai : देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्गावर सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू झाली आहे. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील कांरजालाड आणि वाशिम जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सोमवारी कांरजालाड येथील ३ मेगावॅट आणि मेहकर येथील २ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पातून वीज निर्मितीला सुरुवात झाली असून, या प्रकल्पामुळे समृद्धी महामार्ग देशातील पहिला पथदर्शी हायवे प्रकल्प ठरला आहे.
नागपूर–मुंबईला जोडणाऱ्या ७०१ कि.मी. लांबीच्या समृद्धी महामार्गावर आतापर्यंत सव्वा दोन कोटीहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. महामार्गाच्या आराखड्यात सुरुवातीपासूनच वेगवान प्रवासाबरोबर सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. एकूण २०४ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प महामार्गावरील विविध इंटरचेंजवर उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ९ मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
सौरऊर्जेच्या माध्यमातून महामंडळाला पथकराव्यतिरिक्त उत्पन्नाचा नवा स्त्रोत उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ‘महासमृद्धी रिन्युएब्ल एनर्जी लि.’ या विशेष उद्देश वाहन कंपनीमार्फत हा प्रकल्प उभारण्यात आला असून, महावितरणसोबतच्या करारान्वये निर्मित वीज विक्री केली जाणार आहे. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना–१ अंतर्गत महामंडळाने प्रति युनिट ३ रुपये ०५ पैशांच्या दराने वीज विक्री करण्याचे करारनामा केला आहे.
महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल म्हणाले, “महामंडळांच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. केवळ समृद्धी महामार्गच नाही तर आगामी महामार्गांच्या इंटरचेंजवरही सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. यामुळे कार्बन क्रेडिट मिळणार असून त्याचा उपयोग पायाभूत प्रकल्पांसाठी निधी उभारण्यास होईल.”
Bacchu Kadu : तहसील कार्यालयात सोयाबीन, संत्रा व केळी फेकून निषेध
हा प्रकल्प महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यान्वित करण्यात आला. सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य महाव्यवस्थापक पर्यावरण नरेंद्र टोके, मुख्य वित्त अधिकारी श्रीधर मच्छा, मुख्य अभियंता दिपक सोनटक्के, कार्यकारी अभियंते भूषण मालखंडाळे, सतीश आकोडे आणि नितीन झाडबुके यांनी प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केली.
____






