Flood-affected villagers express anger at Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांवर पूरग्रस्त ग्रामस्थांचा रोष
Solapur : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. पूरस्थितीमुळे शेतकरी आणि सामान्य जनतेचे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नुकताच दौरा करून पाहणी केली. मात्र, माढा तालुक्यातील उंदरगाव येथे आज आमदार सदाभाऊ खोत पाहणीसाठी पोहोचताच ग्रामस्थांचा रोष उफाळून आला. “आठ दिवस कुठे होतात? आता का आलात?” अशा सवालांनी ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला. वाढता विरोध पाहून सदाभाऊ खोतांना दौरा अर्धवट सोडून निघावं लागलं.
गावकऱ्यांनी खोतांवर केवळ उशिरा आल्याचा आरोपच केला नाही, तर जुन्या मुद्द्यांवरूनही नाराजी व्यक्त केली. एका ग्रामस्थाने सांगितलं, “ते निवडणुकीला उभे राहिले तेव्हा आम्ही त्यांना मदत केली. गावाने लाख-दीड लाख रुपये दिले. ९० टक्के गाव त्यांच्या पाठीशी उभं होतं. पण त्यानंतर ते आलेच नाहीत. आज इतक्या दिवसांनी ते पाहणीला आले, याला काय अर्थ आहे?”
ग्रामस्थांनी आरोप केला की, सदाभाऊ खोत सतत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात राहिले, स्वतःच्या मुलासाठी राजकारणात गुंतले, पण शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. “ते गावात येऊन केवळ मीडियाला बाईट देऊन जातात, पण घराघरात येऊन परिस्थिती जाणून घेत नाहीत,” अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Help for farmers : शेतकऱ्यांना तातडीची मदत थेट खात्यात जमा होईल !
माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पूरामुळे शेतजमिनी वाहून गेल्या, घरात पाणी शिरलं, जनावरं वाहून गेली. ग्रामस्थ हतबल अवस्थेत असताना खोत इतक्या उशिरा आल्याने त्यांचा संताप ओसंडून वाहिला. वाढत्या तणावामुळे सदाभाऊ खोतांनी पाहणी थांबवून गाडीत बसून तातडीने माघार घेतली. उंदरगावात घडलेल्या या प्रकारामुळे खोतांना स्थानिकांचा रोष किती तीव्र आहे, हे स्पष्ट झालं आहे.








