comments upon arriving late in Nashik : नाशिकमध्ये उशिरा पोहोचताच मिश्किल टिप्पणी
Nashik : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये आयोजित एक दिवसीय शिबिराला आज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उशिराने दाखल झाले. त्यांच्या उशिरा आगमनावरून आणि त्यानंतर झालेल्या प्रसंगामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले.
जयंत पाटील आल्यानंतर शिबिराच्या ठिकाणाबाहेर स्वामी नारायण ट्रस्टच्या वतीने पितृ पक्षानिमित्त होम हवन सुरू होतं. या विषयी जयंत पाटील यांना कल्पना नव्हती. गाडीतून उतरून ते थेट त्या दिशेने गेले. कार्यकर्त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत ते मंडपापर्यंत पोहोचले होते.
यानंतर शिबिराकडे जाताना जयंत पाटील यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “मला वाटलं आपल्या धोरणाचा भाग म्हणून हे सुरू केलं आहे की काय!” असं ते म्हणाले. पुढे पत्रकारांनी याबाबत विचारलं असता, “काय भानगड सुरू आहे ते पाहायला गेलो होतो,” असं त्यांनी स्पष्ट केलं. शिबिरात उशिरा येण्यामागे भारतीय रेल जबाबदार असल्याचाही त्यांनी हलक्याफुलक्या शब्दात टोला लगावला.
पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवरही टीका केली. “आज अधिवेशन आहे, त्यामुळे मंथन होईल. पाकिस्तानने पहलगाम हल्ला केला. त्यानंतर भाजप नेते ‘खून और पाणी साथ मै नही बहेगा’ म्हणत होते. पण आता तेच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहेत. त्यांची धोरणं महिन्याला बदलतात,” असं ते म्हणाले.
दरम्यान, भाजपच्या “देवा भाऊ” कॅम्पेनला शरद पवार गटाने नाशिक जिल्ह्यात जाहिरात देऊन प्रत्युत्तर दिलं आहे. “शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीचं नुकसान, २१०० रुपये बहिणींना आणि युवांना रोजगार” या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल करण्यात आला आहे.
OBCs Vow to Protect Reservation : ओबीसी संघटनांचा १० ऑक्टोबर रोजी महामोर्चा
याच पार्श्वभूमीवर सोमवारी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.








