Left the party for candidacy, now trying to come back : विधानसभा निवडणुकीत निर्णय चुकला; पुन्हा पक्षात परतण्याची इच्छा
Akola विधानसभा निवडणुकीत तिकिटाच्या गणितामुळे पक्ष सोडून गेलेल्या अनेक माजी आमदार व पदाधिकाऱ्यांना आता ‘घरवापसी’चे वेध लागले आहेत. निवडणुकीत पराभवाचा सामना केल्यानंतर हे नेते पुन्हा आपल्या मूळ पक्षात येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
बाळापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी भाजप सोडून शिंदे गटातून उमेदवारी घेतली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे समजते. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही ही शक्यता व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे नातेपुते यांनी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा आधार घेतला होता. तसेच वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातील काँग्रेसचे सुनील धावेकर यांनीही वंचितमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता दोघेही काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.
डॉ. झिशान हुसेन यांनी वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारी घेतली होती, मात्र नंतर त्यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे ते काँग्रेससोबत राहिले असले, तरी पक्षात फारसे सक्रिय नाहीत. त्यांच्या भविष्यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे कृष्णा अंधारे आणि भाजपचे डॉ. अशोक ओळंबे यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आता ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतण्याच्या प्रयत्नात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मूर्तिजापूर मतदारसंघातील रवी राठी यांनाही पक्षात परतण्याची इच्छा असून, त्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून कळते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही नेते मूळ पक्षात परतण्याचा विचार करत असले, तरी संबंधित पक्षांनी अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणाऱ्यांना परत स्थान द्यायचे का, याबाबत वरिष्ठ स्तरावर विचार सुरू आहे. त्यामुळे या नेत्यांची पक्षप्रवेशाची इच्छा पूर्ण होते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.