maharashtra-budget-2026-devendra-fadnavis-announces-benefits-for-women-lakhpati-didi-single-women-policy : लखपती दीदी ते एकल महिलांसाठी धोरण, फडणवीसांचा विशेष भर !
Mumbai: राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करत महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील महिलांना शुभेच्छा देत लखपती दीदी योजना, एकल महिलांसाठी धोरण आणि स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील एकल महिलांसाठी विशेष धोरण तयार करण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे सविस्तर विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे एकल महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘लखपती दीदी’ योजनेलाही यंदाच्या अर्थसंकल्पात मोठा भर देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात सुमारे 37 लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या असून 2026-27 या आर्थिक वर्षात आणखी 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपयांपर्यंत नेण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
याशिवाय महिला स्वयंसहायता समूहांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी ‘उमेद मॉल’ संकल्पना राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ जिल्हा विक्री केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली असून यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
Maharashtra budget 2026 : पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प ते‘तिसरी-चौथी मुंबई’ विकास आराखडा
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. या योजनेसाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली असून राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लखपती दीदी योजना ही ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे बचत गटांशी संबंधित महिलांना सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली जाते. शिवणकाम, प्लंबिंग, एलईडी बल्ब उत्पादन, ड्रोन ऑपरेशन यांसारख्या विविध क्षेत्रांत प्रशिक्षण देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. ग्रामीण महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे आणि त्यांच्या उत्पन्नाच्या संधी वाढवणे हा या योजनेमागील मुख्य हेतू आहे.
पुढील जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या या घोषणांमुळे राज्यातील महिलांसाठी सरकारने सक्षमीकरणाचा ठोस रोडमॅप मांडल्याची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरू झाली आहे.
__








