Nana Patole complains that there is no response to the first week’s proposal yet : एमईपी इन्फ्रास्ट्रक्चरला नियमबाह्य मुदतवाढ दिल्याने शासनाचे नुकसान
Mumbai : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर विरोधी पक्षाने पहिला आठवडा प्रस्ताव सादर केला. आता दुसऱ्या आठवड्याचे जवळपास अर्धे कामकाज पूर्ण झाले तरीही पहिल्या आठवड्यातील प्रस्तावाला उत्तर देण्यात आले नाही. हा मुद्दा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सभागृहात मांडला. सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला उत्तर आले पण विरोधकांच्या प्रस्तावावर सरकारने उत्तर दिले नाही, याबद्दल पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.
शाळा, महाविद्यालयांच्या बसेसना मुंबई प्रवेशद्वाराच्या परिसरातील पाच टोल नाक्यांतून सवलत देण्यात आल्याचाही हरकतीचा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाअंतर्गत मुंबई प्रवेशद्वाराच्या बसस्थानकावरील हलकी वाहने, स्कूल बसेस, महामंडळाच्या बसेस यांना टोल नाक्यातून सूट देण्यात आली आहे. याची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्याबाबत सरकारने भरपाई निश्चित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमीत करून मे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला नियमबाह्य मुदतवाढ देण्यात आली. यामध्ये शासनाचे जवळपास ३ हजार कोटीचे नुकसान झाले आहे.
या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची २०१० ते २०२५ ची टोल वसूली आणि २७ उडाणपुलांची दुरूस्ती महामंडळाने स्वतः करावी, ही मागणी केली होती. १४.१०.२०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महामंडळाअंतर्गत पाच स्थानकांवर पथकातून सूट दिल्यामुळे नुकसान भरपाईसाठी महामंडळाने प्रस्ताव केला. पाच टोल नाक्यांवर सूट देण्यास मान्यता देण्यात आली. पण यामध्ये शासनाचे जे तीन हजार कोटींचे नुकसान झाले, त्याचे काय असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.








