Maize producer farmers : २० लाख क्विंटल उत्पादन, खरेदी फक्त ६० हजार! मका उत्पादक हवालदिल

buldhana-maize-crisis-farmers-distressed-over-low-nafed-procurement-target : नाफेडचे खरेदी उद्दिष्ट नगण्य असल्याचा आरोप; उद्दिष्ट संपल्याने केंद्र बंद, खासगी व्यापाऱ्यांकडून लूट

Buldhana जिल्ह्यात यंदा मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असताना शासनाच्या संथ खरेदी धोरणामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. नाफेड (NAFED) मार्फत केली जाणारी मका खरेदी अत्यंत तुटपुंजी असून, उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करत अनेक केंद्रे बंद करण्यात आली आहेत. यामुळे हक्काचा हमीभाव मिळवण्यासाठी नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

चालू २०२५-२६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५२,८५५.७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड झाली आहे. शासकीय निकषानुसार जिल्ह्यात तब्बल २०,६१,३७२ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ ६० हजार क्विंटल इतकेच तुटपुंजे खरेदी उद्दिष्ट देण्यात आले आहे. उत्पादनाच्या तुलनेत खरेदीचे हे प्रमाण नगण्य असल्याने जिल्हाभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Sanjay Raut : राज्यसभा- विधान परिषद निवडणुकीवर महाविकास आघाडीत चर्चेची लगबग

जिल्ह्यातील सुमारे ५,७०० शेतकऱ्यांनी रीतसर नोंदणी करूनही “उद्दिष्ट पूर्ण” झाल्याचे कारण सांगून केंद्रांवरील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, हजारो शेतकऱ्यांच्या घरात मका साठून राहिला आहे. शासकीय केंद्रांवर माल घेतला जात नसल्याचा गैरफायदा घेत खासगी व्यापाऱ्यांनी बाजारभाव पाडले आहेत. हमीभावापेक्षा कमी दराने मका विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

“एकीकडे मोठ्या घोषणा केल्या जातात आणि दुसरीकडे प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी तांत्रिक कारणे सांगून हात झटकले जातात,” अशी संतप्त भावना सामान्य शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Shegao Politics : शेगावात नगराध्यक्षांना मोठा धक्का; पहिल्याच बैठकीत भाजपने बजेट फेटाळले

या गंभीर परिस्थितीची दखल घेत शासनाने तातडीने मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवून सर्व केंद्रे पूर्ववत सुरू करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचा माल हमीभावाने खरेदी केल्यास त्यांना आर्थिक आधार मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारीपणाला सामोरे जावे लागेल. जिल्ह्यातील मका उत्पादकांमध्ये सरकारविरोधात वाढत असलेला हा असंतोष लक्षात घेता, प्रशासन तातडीने काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.