Sharad Pawar emotional statement before Sunetra Pawar swearing in ceremony : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीआधी शरद पवारांचे भावनिक विधान
Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी पाच वाजता मुंबईत होणाऱ्या या शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या कार्याची आठवण काढत अनेक महत्त्वाच्या बाबींवर स्पष्ट भूमिका मांडली.
शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे गेली अनेक वर्षे संघटनेचे काम खांद्यावर घेऊन चालत होते. सामान्य माणसाशी थेट संवाद ठेवून, त्यांच्या प्रश्नांची सखोल माहिती करून घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणून अजित पवार ओळखले जात होते. त्यांच्या कामाची सुरुवात पहाटे व्हायची आणि दिवसभर ते फिल्डवर सक्रिय असायचे. आज अजित पवार हयात असते, तर ते घरी थांबले नसते, तर जनतेतच काम करताना दिसले असते, अशा शब्दांत शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याबाबतही महत्त्वाची माहिती दिली. गेल्या चार महिन्यांपासून या विषयावर सकारात्मक चर्चा सुरू होत्या आणि या चर्चांचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते, असे शरद पवार म्हणाले. दोन्ही गटांमध्ये एकत्र काम करण्यावर एकमत झाले होते आणि हा निर्णय 12 तारखेला जाहीर करण्याचे नियोजन होते. ही तारीख स्वतः अजित पवारांनी सुचवली होती. मात्र, अचानक घडलेल्या घटनेमुळे हे चित्र बदलले. अजितदादांची जी इच्छा होती, ती पूर्ण व्हावी, ही आमचीही इच्छा आहे, असे सूचक विधान करत शरद पवारांनी आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारली नाही.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, मला याबाबत अधिक माहिती नाही, मी सकाळी वृत्त वाचले. अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या निधनानंतर कुणीतरी पुढे यावे लागणार होते आणि पक्षाने त्याबाबत निर्णय घेतला आहे. तो पक्ष त्यांचा आहे आणि त्यांनी जे ठरवले आहे, त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. आमचा राजकीय मार्ग वेगळा आहे, मात्र परिवार म्हणून आम्ही साथ देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर टिप्पणी करण्याचे कारण नाही, असे सांगत शरद पवारांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. दरम्यान, सुनेत्रा पवार आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात हा क्षण ऐतिहासिक ठरणार आहे.
___








