Pakistani people in Amravati get relief : सरकारच्या निर्णयात बदल; अमरावतीत राहतात दीर्घकालीन व्हिसावर
Amravati काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. सुरुवातीला सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हीजा तत्काळ रद्द करून, त्यांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकारने निर्णयात थोडा बदल करत अमरावतीतील ११८ पाकिस्तानी नागरिकांना दिलासा दिला आहे.
अमरावती शहरात सध्या ११८ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. हे सर्व पाकिस्तानातील हिंदू निर्वासित आहेत. ते गेल्या १० ते १५ वर्षांपासून येथे दीर्घकालीन (लाँग टर्म) व्हिजावर राहतात. अनेकांनी येथे व्यवसायही सुरू केले आहेत. याशिवाय, भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रियाही सुरु असून पडताळणीनंतर त्यांना नागरिकत्व दिले जात आहे.
पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी माहिती दिली की, मागील महिन्यात एक मोठा पाकिस्तानी हिंदू जत्था धार्मिक कार्यक्रमासाठी अमरावतीत आला होता, मात्र कार्यक्रमानंतर सर्वजण परत गेले आहेत. अमरावतीत राहणारे पाकिस्तानी नागरिक हे मुख्यतः हिंदू धर्मीय आहेत. त्यांना भारत सरकारने दीर्घकालीन व्हिजा दिला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हीजा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन देशभरातील पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना हाकलून देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हिंदू निर्वासित आणि लॉंग टर्म व्हिजाधारक पाकिस्तानी नागरिकांना या कारवाईतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले की, “अमरावतीत हिंदू निर्वासित व लॉंग टर्म व्हिजाधारक नागरिकांशिवाय इतर कोणताही पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास नाही.” त्यामुळे येथील पाकिस्तानी हिंदूंना मोठा दिलासा मिळाला आहे.