Direct fight in BJP-Congress : निवडणुकांची प्रतीक्षा संपणार; जागावाटपावरून वाढणार पेच
Akola मार्च २०२२ पासून प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या नागपूर, अमरावती, चंद्रपूर व अकोला या चार महापालिकांमध्ये आगामी चार महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे विदर्भात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट लढतीची शक्यता असून, दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची राजकीय परीक्षा लागणार आहे. त्याचवेळी महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यातील मित्र पक्षांमध्ये जागावाटपावरून पेच वाढणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यासारख्या नेत्यांसाठी या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.
Kirit Somaiya : घोटाळ्याचे दुष्परिणाम; सहा हजार जन्मदाखले रद्द होणार!
नागपूर : काँग्रेससमोर आव्हान मोठे
नागपूर महापालिकेत भाजपकडे पूर्वी १०८ नगरसेवक होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपचे वर्चस्व राहिले. काँग्रेसने संघटन बळकट करण्याचा प्रयत्न केला असला, तरी अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला तिकीट वाटपात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गडकरी आणि फडणवीसांचे हे गृहजनपद असल्याने काँग्रेससमोर येथे विशेष आव्हान असेल.
चंद्रपूर : गटबाजीमुळे दोन्ही पक्षांची कसोटी
चंद्रपूरमध्ये भाजपचे पाच आमदार असूनही अंतर्गत गटबाजी पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे संघटनावर प्रभाव असूनही त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे असंतोषाचे चित्र आहे. दुसरीकडे, काँग्रेसमध्येही विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटात समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची येथे कसोटी लागणार आहे.
अमरावती : नव्या नेतृत्वाचा प्रभाव की भाजपचा पुन्हा विजय?
२०१७ च्या निवडणुकीत भाजपने येथे ४५ जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली होती. यंदा आमदार सुलभा खोडके व विधान परिषद सदस्य संजय खोडके या पती-पत्नी जोडीने काँग्रेसकडून नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची तयारी केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटांमध्ये विभागणी झाल्याने मतविभाजनाची शक्यता आहे. भाजपच्या विजयासाठी हा संधीचा क्षण असला, तरी काँग्रेससाठी मतदारांना परत खेचणे ही मुख्य कळकळ असेल.
Ravi Rana : राणांचा इशारा, पालकमंत्र्यांच्या बैठकीत दोन-चार जणांना निलंबितच करतो
अकोला : सत्ता टिकवण्याचे आव्हान भाजपपुढे
अकोल्यात भाजपने ४८ नगरसेवकांसह सत्ता मिळवली होती. माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या पराभवानंतर भाजपसमोर प्रतिष्ठेचे संकट आहे. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र आल्यास भाजपसमोर टक्कर अधिक तीव्र होऊ शकते. भाजपचे रणधीर सावरकर येथे सत्ता कायम ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.