Congress leader Vijay Wadettiwar said, NCP’s stance is BJP’s ploy : पहिले राष्ट्रीय पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न मग प्रादेशिक पक्षांनाही खतपाणी बंद
Nagpur : एका पक्षाचा वापर झाला की दुसऱ्या पक्षाला सोबत घ्यायचे आणि पहिला पक्ष संपवायचा. यामध्ये भाजपचे राजकारण स्पष्ट दिसते आहे. दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांचा वापर करा अन् नंतर फेका, ही भाजपची नीती आहे. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का, हे आत्ता सांगणे शक्य होणार नाही. पण शरद पवारांच्या भूमिकेवर सध्याच भाष्य करणेही योग्य होणार नाही, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
नागपुरात आज (१२ मे) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भाजप आधी काँग्रेसला कमकुवत करून जनमत प्रादेशिक पक्षांकडे नेण्याचे काम करते. एकदा राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाली की प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम करते. काही दिवसांनी प्रादेशिक पक्षांना खतपाणी घालणे बंद होते. यातुन त्यांचे दोन्ही उद्देश साध्य होतात. हाच त्यांच्या राजकीय नितीचा भाग असू शकतो.
लाडक्या बहीणींच्या अनुदानाबद्दल विचारले असता, सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे अनुदान लाडक्या बहीणींना देण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा पत्ता नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन हा लॉपीपॉप असू शकतो. खरं – खोटं काय, ते योजना प्रत्यक्षात आल्यानंतरच सांगता येईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
Operation Sindoor : भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारच्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा !
एप्रिल आणि मे महिन्यात पाऊस पडतो आहे. अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पण नुकसानाचे पंचनामे अद्यापही केलेले नाहीत. त्यासंदर्भात आदेशच सरकारने दिले नाही, मग प्रशासकीय यंत्रणा तरी काय करणार? येवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही सरकार शेतकऱ्यांप्रति इतके निष्ठूर कसे होऊ शकते? रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन करणार आहो, असे वडेट्टीवार म्हणाले. भाजीपाल्याचे पीक पूर्णतः नष्ट झाले आहे आणि वातावरण अजूनही नुकसान करण्याचेच आहे. त्यामुळे पंचनामे तातडीने करावे, असेही ते म्हणाले.