New law to be introduced in the monsoon session : पावसाळी अधिवेशनात येणार नवा कायदा, बावनकुळेंची माहिती
Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता यंदाचे पावसाळी अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुका दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतर झाल्या तर महायुती सरकारकडे पावसाळी अधिवेशनाचाच पर्याय उरला आहे. लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या अधिवेशनात होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर नवा कायदा पावसाळी अधिवेशनात येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामध्ये रहिवाशी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमीनीचा तुकडा पाडता येईल, असा कायदा आम्ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणतो आहे, असे महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
Rashtriya Swayamsevak Sangh : संघाची दिल्लीत बैठक, भाजपचा अध्यक्ष ठरणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याची सुधारणा करा याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही सुधारणेचे पुढचे पाऊल टाकतो आहोत. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर महसूल खात्यामध्ये जवळपास महत्त्वाचे १७-१८ निर्णय आम्ही घेतले. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. अधिवेशनात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन, व्हर्टिकल स्वामित्व देण्याबाबत प्रयत्न करणार आहोत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे हे नवी दिल्लीत केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या भेटीसाठी गेले होते. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एनटीपीसी प्रकल्पात कुंभारी गावाचे पुनर्वसन व्हावे. शेती संपादन केली त्याचपद्धतीने घरांचे पुनर्वसन झाले पाहिजे. याबाबत खट्टर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी हा दौरा होता असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा नेहमीच केंद्रस्थानी राहिली असून, आमच्या विधानमंडळातील संपूर्ण कामकाज मराठीतच आहे. विधानमंडळातील सर्व फलकदेखील मराठीतच आहेत असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी जे उपक्रम सुरू केले आहेत ते स्वतंत्र भारताच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नव्हते.
महिलांचे सक्षमीकरण मोदींच्या काळात जेवढे होत आहे, तितके पूर्वी कधीही झाले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत महिलांना प्राधान्य दिले. लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणि सत्ताकेंद्रात आणण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केले आहेत, याकडेदेखील त्यांनी लक्ष वेधले.