Forest-to-knowledge-resources-Mungantiwar-Timber-Museum-Xylarium-global-attraction : १५० कोटींचे टिंबर म्युझियम व झायलरियम ठरणार जागतिक आकर्षण
Mumbai: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथे ‘टिंबर म्युझियम’ आणि ‘झायलरियम’ उभारण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला. हा प्रस्ताव फक्त एखाद्या प्रकल्पाचा नसून अनेक अंगांनी चंद्रपूरला विकसित जिल्ह्यांच्या यादीत आघाडीवर आणण्याचे माध्यम आहे. वनसंपदेचे संशोधन, जतन आणि पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट्य यातून साध्य होणार आहे. आणि त्यासाठी मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार, अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे.
राज्याच्या विधिमंडळात वर्षानुवर्षे एक सारख्या प्रश्नांवर चर्चा होत असते. पाणी, रस्ते, गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या, निधीअभावी रखडलेली कामे. ही वास्तवाची जखम आहे; पण विकासाची उंच झेप ही केवळ जखमा मोजण्यातून मिळत नाही. ती मिळते दूरदृष्टीतून. आणि जेव्हा एखादा प्रश्न स्थानिक मर्यादा ओलांडून राज्याच्या बौद्धिक, पर्यावरणीय आणि आर्थिक भवितव्याशी जोडला जातो, तेव्हा तो केवळ प्रस्ताव राहत नाही तो एक दृष्टीकोन बनतो. सुधीर भाऊंनी मांडलेला हा प्रस्ताव देखील विकासाची दूरदृष्टी सिद्ध करणारा आहे. सर्व समावेशक विकासाच्या दृष्टिकोनातून राज्याला जागतिक पातळीवर ओळख देणारे असे खूप कमी प्रस्ताव पाहायला मिळतात.
सुधीर मुनगंटीवार यांचा हेतू केवळ भावनिक नाही, तर “वनसंपदा ही आर्थिक व सांस्कृतिक भांडवल आहे” हा संदेश अधोरेखित करणारा आहे. वनसंपदेचे ज्ञानसंपदेत रूपांतर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘हॅपिनेस इंडेक्स’चा संदर्भ देत त्यांनी विकासाची व्याख्या केवळ जीडीपीपुरता मर्यादित न ठेवता ज्ञान, गुणवत्ता आणि पर्यावरण संतुलनाशी जोडली. त्यांच्या ऐतिहासिक संदर्भासह दिलेल्या निवेदनातील तळमळीचे हे सूत्र एका नव्या विकासाकडे नेणारे आहे.
बल्लारपूरचे सागवान हे केवळ एक साधे लाकूड नाही; तो महाराष्ट्राच्या मातीचा आत्मविश्वास आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर असो, देशाचे संसद भवन असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारत मंडपम असो. ज्या दरवाजातून, ज्या फर्निचरच्या साक्षीने राष्ट्रीय निर्णय घेतले जातात, त्या प्रत्येक काष्ठात विदर्भाच्या जंगलाचा श्वास दडलेला आहे. देहरादून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटसारख्या संशोधन संस्थांनी महाराष्ट्रातील सागवानाची गुणवत्ता मान्य केली आहे. हा अभिमान केवळ भावनिक नाही; त्या वैज्ञानिक दृष्टीची झालर आहे.
पण प्रश्न इतक्यावर थांबत नाही. नैसर्गिक संपत्तीचे ज्ञानसंपदेत रूपांतर करण्याची वेळ आली आहे. जगाची अर्थव्यवस्था आता केवळ जीडीपीवर उभी नाही; ती उभी आहे गुणवत्ता, संशोधन, नवोन्मेष आणि पर्यावरणीय संतुलनावर. संयुक्त राष्ट्रसंघ ‘हॅपिनेस इंडेक्स’ मोजतो, कारण समृद्धीची खरी व्याख्या ही माणसाच्या जीवनमानात आणि बौद्धिक उंचीत आहे. अशा वेळी बल्लारपूरमध्ये उभे राहणारे टिंबर म्युझियम आणि झायलरियम हे केवळ प्रदर्शन केंद्र नसून “ज्ञानाचे हरित विद्यापीठ” ठरू शकते.
हा प्रकल्प केवळ पर्यटन वाढवणार नाही, तर लाकूड तंत्रज्ञान, वनसंवर्धन, पर्यावरण व्यवस्थापन आणि हस्तकला उद्योगाला नवी चालना देईल. दीर्घकालीन दृष्टीने हे केंद्र विदर्भाला संशोधन नकाशावर स्थान मिळवून देऊ शकते.
वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत “हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू” असा शब्द सभागृहात दिला. निधी उपलब्ध करून काम सुरू करण्याचे संकेत देत त्यांनी मुनगंटीवारांच्या भावनेचा सन्मान राखण्याचे आश्वासन दिले.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचा महापौर २४ कॅरेट शुद्ध भाजपचाच, भिवंडीत तुमचा आहे का?
मुनगंटीवारांचा हा प्रस्ताव केवळ स्थानिक विकासापुरता मर्यादित नाही. तो पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक वारसा, संशोधन, युवकांना रोजगारनिर्मिती आणि राज्याच्या बौद्धिक प्रगतीचा व्यापक आराखडा आहे. अधिवेशनातील नेहमीच्या आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मांडलेली ही कल्पना दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.
वनसंपदेपासून ज्ञानसंपदेपर्यंतचा हा प्रवास जर प्रत्यक्षात उतरला, तर बल्लारपूर हे केवळ सागवानासाठी नव्हे तर पर्यावरणीय संशोधन व शिक्षणासाठी जागतिक पातळीवरील आकर्षणकेंद्र ठरू शकते. महाराष्ट्राच्या विकासाला नवा बौद्धिक आयाम देणारी ही संकल्पना आता प्रत्यक्षात कधी साकारते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
__








