raj-thackeray-criticism-devendra-fadnavis-maharashtra-debt-gudi-padwa-melava-mumbai : राज्य कर्जबाजारी, पण निषेध मोबाईलवरच नोंदवायचा, फडणविसांना डिवचले
Mumbai : गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली. विशेषतः महाराष्ट्रावरील वाढत्या कर्जाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर सुमारे २ लाख कोटींचे कर्ज होते, मात्र आज तेच कर्ज ११ लाख कोटींपर्यंत पोहोचल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. सरकारने तुम्हाला इन्स्टाग्रामच्या रिल्समध्ये गुंतवून ठेवले आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नव्हे तर मोबाईलवरच निषेध नोंदवायचा, याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सध्याच्या आणि माजी सरकारांची तुलना करत राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत, महाराष्ट्राला तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट सांगितले जात आहे, मात्र प्रत्यक्षात राज्यावर प्रचंड कर्जाचा बोजा वाढत असल्याची टीका त्यांनी केली. कर्जमाफीसारख्या उपाययोजना तीन वेळा करण्यात आल्या, तरीही शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
Raj thackeray : राज ठाकरेंचा फडणवीसांवर कर्जाच्या मुद्द्यावर हल्लाबोल
राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. रोज शेतकरी आत्महत्या करत असून ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोस्टल रोडसारखे प्रकल्प सामान्य जनतेसाठी नसून बाहेरच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी असल्याचेही त्यांनी म्हटले.
तसेच उद्योगपतींकडून मोठ्या प्रमाणावर जमिनी घेतल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्राची ओळख आणि स्थानिकांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाषा आणि संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत भाषा नष्ट झाली तर समाजही नष्ट होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनोरंजनाच्या माध्यमातून जनतेला मूळ प्रश्नांपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी आयपीएल आणि चित्रपट यांचा उल्लेख केला. सोशल मीडियामध्ये अडकून न राहता नागरिकांनी प्रत्यक्ष प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते, मात्र आता निषेधही मोबाईलपुरता मर्यादित राहिल्याची टीका त्यांनी केली.
Ashok kharat case : रुपाली पाटील-ठोंबरेंच्या ‘फरार’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
माध्यमांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारविरोधात भूमिका घेतल्यास जाहिराती बंद करण्याची धमकी दिली जाते, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत देशातील लोकशाही व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. या सर्व मुद्द्यांवरून राज ठाकरे यांच्या भाषणाने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.








