Complaints are being received about misuse of water supply scheme funds : पाणीपुरवठा योजनेच्या निधीचा दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी
Wardha News : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे अतिशय कासवगतीने सुरू आहे. शिवाय पाणीपुरवठा योजनेच्या निधीचा दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. देवळी व वर्धा तालुक्यातील कोणत्याही गावात पाणी टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी तत्पर असावे, असे निर्देश आमदार राजेश बकाने यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पंचायत समितीच्यावतीने आयोजित तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्याच्या आढावा बैठकीचे अध्यक्ष म्हणून आमदार बकाने बोलत होते. या बैठकीला देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर, वर्ध्याचे तहसीलदार संदीप पुंडेकर, पुलगावच्या अप्पर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल लोखंडे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत देवळी तालुक्यातील ६३ गावांचा तसेच वर्धा तालुक्यातील ५९ गावांच्या पाणी टंचाई निवारणासाठी आराखडा तयार करण्यात आला. तसेच अपेक्षित उपाययोजनेचा आढावा घेण्यात आला. बैठकीत उपस्थित असलेले सरपंच तसेच पदाधिकारी यांनी आपल्या गावातील पाणी समस्याचा तसेच उपाययोजनांबद्दल माहिती दिली.
यामध्ये जलसिंचन मिशनची रखडलेली कामे, पाण्याच्या टाकीचे निकृष्ठ बांधकाम व तांत्रिक अडचणी, सार्वजनिक विहिरींचे अधिग्रहण, विहिरींतील पाण्याचा स्तोत्र वाढविण्यासाठी आडवे बोर मारणे, विहिरींचा गाळ उपसणे, नवीन विंधन विहिरींचे बांधकाम करणे तसेच विंधन विहिरींची दुरुस्ती करणे, महावितरण विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावस्तरावरील पाणीपुरवठा योजनेत येणाऱ्या अडचणीसह इतर समस्यावर चर्चा करण्यात आली.
Cyber police : ‘फ्री गिफ्ट’चा मेसेज येतो, अन् खाते साफ करून जातो!
उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी प्रफुल लोखंडे यांनी केले. संचालन विजय पचारे यांनी केले तर आभार दिलीप ढोणे यांनी मानले. या बैठकीला विस्तार अधिकारी प्रमोद बिडवाईक, आकाश राठोड, कृषी अधिकारी अनिल गादेवार तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.