sunetra-pawar-beed-development-roadmap-maharashtra-din-ajit-pawar-vision-2026 : विकासाचा नवा संकल्प; मांडला ६२३ कोटींचा रोडमॅप
Beed: जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने व्यापक विकास आराखडा जाहीर केला. अजितदादा पवार यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध असून बीड जिल्ह्याला सक्षम, विकसित आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथे ध्वजारोहण केल्यानंतर नागरिकांना संबोधित करताना सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे सांगितले. मराठवाड्याची संत आणि वीरांची परंपरा अधोरेखित करत त्यांनी बीडच्या प्रगतीसाठी दिवंगत अजितदादा पवार यांनी आखलेल्या योजनांचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या विकास प्रक्रियेला पुढे नेण्याची जबाबदारी आपण स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Lpg cylinder price : व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरवाढीचा मोठा धक्का
बीड जिल्ह्यासाठी ६२३ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून विविध क्षेत्रांमध्ये प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण आणि कौशल्य उपलब्ध व्हावे यासाठी एमआयडीसीमध्ये टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने सुमारे ११७ कोटी रुपयांचा आयटी प्रकल्प उभारला जात असून याचा लाभ सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून बीडमध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा देखील करण्यात आली.
दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या बीड-अहिल्यानगर-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामासाठी निधी मंजूर करण्यात आला असून हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. तसेच अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या विकासासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्य सेवा हक्क अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीत बीड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा नुकताच सन्मान करण्यात आल्याचे सांगत त्यांनी याचा अभिमान व्यक्त केला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन बीड जिल्ह्याला राज्यातील अग्रगण्य जिल्हा बनवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित विकासाची दिशा कायम ठेवत राज्याची सुसंस्कृत ओळख अधिक बळकट करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
__








