monsoon-2026-early-arrival-in-andaman-skymet-weather-update : मान्सूनच्या आगमनाची मोठी चाहूल
Mumbai : राज्यभर वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले असतानाच हवामान विभागाकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा मान्सूनचे अंदमानात नियोजित वेळेपूर्वी आगमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाची लवकर चाहूल लागू शकते. खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नैर्ऋत्य मान्सूनला गती मिळणार आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, 12 आणि 13 मेदरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ तसेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे समुद्रावरील वाऱ्यांचा वेग वाढणार असून मान्सूनच्या पुढील प्रवासाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे यंदा मान्सून सरासरी तारखेच्या आधीच अंदमानात दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यापूर्वी मान्सून 14 ते 22 मेदरम्यान अंदमानात पोहोचेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता हवामानातील बदलत्या घडामोडींमुळे त्याचे आगमन त्याही आधी होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागानेही 14 ते 20 मेदरम्यान अंदमान समुद्र परिसरात नैर्ऋत्येकडील वारे सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Rupali chakankar : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर एसआयटीसमोर
सामान्यतः अंदमानात मान्सून दाखल झाल्यानंतर सुमारे 21 दिवसांत तो कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे अंदमानात मान्सून लवकर पोहोचल्यास महाराष्ट्रातही वेळेआधी किंवा वेळेवर पावसाचे आगमन होण्याची शक्यता वाढली आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही बातमी मोठा दिलासा मानली जात आहे.
दरम्यान, राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होताना दिसत आहे. पालघर, कल्याण आणि डोंबिवली परिसरात तापमानाने 40 ते 44 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. कोकण भागात वाढलेल्या आर्द्रतेमुळे असह्य उकाडा जाणवत असून नागरिक घामाघूम झाले आहेत. रायगड जिल्ह्यात तापमान 39 अंशांवर पोहोचले असताना शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान वीज पडून एका 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Nashik tcs case : निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप, घर आणि कार्यालयावर ‘बुलडोझर’ कारवाई?
एकीकडे मान्सूनची उत्सुकता वाढत असताना दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक जलस्रोत कोरडे पडल्याने तब्बल 33 गावांना पाणीटंचाईचा फटका बसला आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने 29 विहिरी आणि 6 खासगी बोअरवेल ताब्यात घेत पाणीपुरवठा सुरू केला आहे. मंगरूळपीर तालुक्यात सर्वाधिक दहा गावांमध्ये गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.








