Demand raised to revoke the fine imposed on a woman farmer : दंड रद्द करून शासकीय साखळी रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी
Akola शासकीय साखळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या कथित तक्रारीवरून एका महिला शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर तब्बल ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीने तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, दंड तातडीने रद्द करून संबंधित शासकीय रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी केली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात शेतकरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात आक्षेप नोंदविला. यावेळी शेतकरी लता लांडे, मारोती ढोरे आणि सुरेश निंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही व्यक्तींनी झाडे तोडून विहिरीवरील मुरूम आणि माती शेतात टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली. मात्र, प्रत्यक्षात तक्रारकर्त्यांनीच शासकीय साखळी रस्ता अडवून ठेवला असल्याचे माहिती असूनही मंडळ अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या अहवालाच्या आधारे १० एप्रिल २०२६ रोजी महिला शेतकरी पुत्र रवी दुतोंडे यांच्यावर ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तक्रारकर्त्यांना संरक्षण देण्यासाठीच हा आदेश काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. निवेदनानुसार, माझोड येथील गट क्रमांक ३५७, ३५८ आणि ३६० जवळील शासकीय रस्ता तक्रारकर्त्यांनी अडवून ठेवला आहे, तर दंड ठोठावण्यात आलेले रवी दुतोंडे यांची शेती बेलोरा येथे असून, त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
३२ लाख रुपयांचा दंड तत्काळ रद्द करणे, शासकीय साखळी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे आणि भूमी अभिलेख विभागामार्फत पोलिस बंदोबस्तात मोजणी करून पावसाळ्यापूर्वी रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे. तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी प्रकरणाची फेरतपासणी करून आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.








