Congress leader criticises rising inflation, blames the Modi government’s flawed policies : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आक्रमक; चिखलीत तहसीलदारांना निवेदन
Chikhli पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून, ही महागाई नैसर्गिक नसून केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक व इंधन धोरणांचा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला. पेट्रोल-डिझेल दरवाढ, इंधनटंचाई आणि वाढत्या महागाईविरोधात चिखली तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले की, पेट्रोल-डिझेल मिळविण्यासाठी नागरिकांना एक ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लावाव्या लागत आहेत. अनेकांना रात्रभर पेट्रोल पंपावर थांबण्याची वेळ येत असून, २४-२४ तास इंधनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. इंधनदरवाढीमुळे वाहतूक, शेती, उद्योग आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढून महागाईने उच्चांक गाठला आहे.
इराण आणि रशियासारखे देश भारताला स्वस्त दरात इंधन पुरविण्यास तयार असतानाही केंद्र सरकार अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकार जनतेच्या खिशातील पैसा काढून घेण्याचे काम करत असून, सर्वसामान्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
शेतकरी वर्गासमोरील अडचणी अधोरेखित करताना बोंद्रे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळण्यात अडचणी येत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतीची कामे ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच खतांच्या दरात नुकतीच वाढ झाल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार अधिक वाढला आहे.
“सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेतला नाही, तर चिखली तालुका काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.








