Bacchu kadu joins Eknath shinde Shivsena, prahar party workers in dilema: बच्चू कडूंच्या निर्णयानंतरही प्रहारची संघटनात्मक पकड कायम; कार्यकर्त्यांची प्रतीक्षेची भूमिका
Khamgao प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, नेतृत्वाने नवी राजकीय दिशा स्वीकारली असली तरी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते अद्यापही प्रहार जनशक्ती पक्षाशी निष्ठावंत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या निर्णयानंतरही संघटनात्मक पातळीवर संपूर्ण स्थलांतर झालेले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
बच्चू कडू यांच्या प्रवेशामुळे विदर्भातील विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील प्रहारच्या राजकीय भवितव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रहारने शेतकरी, दिव्यांग, बेरोजगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली होती. त्यामुळे नेतृत्वाच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदेसेनेच्या काही कार्यक्रमांमध्ये प्रहारचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहत असले तरी त्यांनी अद्याप अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. अनेक कार्यकर्ते बच्चू कडू यांच्या पुढील स्पष्ट भूमिकेची प्रतीक्षा करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या तरी स्थानिक पातळीवर प्रहारची संघटनात्मक ताकद कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, बच्चू कडू यांचा निर्णय हा राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा असला तरी कार्यकर्त्यांचे भावनिक आणि संघटनात्मक नाते अद्याप प्रहारशी जोडलेले आहे. त्यामुळे नेतृत्वाच्या निर्णयानंतर लगेचच कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेता प्रहारच्या कार्यकर्त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. बच्चू कडू पुढील काळात संघटनेबाबत कोणते निर्देश देतात आणि स्थानिक नेतृत्व कोणती भूमिका घेते, यावरच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
Abhijeet dipke : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी २० जूनला दिल्लीत आंदोलन
विशेषतः खामगावसह बुलढाणा जिल्ह्यातील प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणती राजकीय दिशा स्वीकारतात, याकडे आता महायुती, महाविकास आघाडी आणि स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या पुढील राजकीय भूमिकेची उत्सुकता अधिकच वाढली आहे.








