shivsena-mp-operation-tiger-vikas-nidhi-omraje-nimbalkar-sanjay-dina-patil-fund-utilisation : फुटलेल्या शिवसेना खासदारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. या प्रवेशावेळी काही खासदारांनी विरोधी पक्षात असल्यामुळे विकास निधी मिळत नव्हता आणि मतदारसंघातील विकासकामे रखडत होती, असा आरोप केला. मात्र, उपलब्ध आकडेवारीतून या दाव्यांवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना एमपीएलॅड्स अंतर्गत केंद्र सरकारकडून खासदारांना दरवर्षी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक सुविधा आणि इतर मूलभूत विकासकामांसाठी हा निधी वापरण्याची तरतूद आहे. मात्र शिंदे गटात प्रवेश केलेल्या काही खासदारांकडे कोट्यवधी रुपयांचा मंजूर निधी उपलब्ध असूनही त्यातील मोठा हिस्सा खर्चच न झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
International Yoga Day : योगासनांपेक्षा ‘मखमली हिरवळ’ची चर्चा; शिंदेंच्या पोस्टने रंगले राजकारण
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना आतापर्यंत 18.47 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला होता. मात्र त्यापैकी केवळ 1.97 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 130 विकासकामांपैकी फक्त 21 कामे पूर्ण झाल्याची नोंद आहे, तर तब्बल 16.49 कोटी रुपये अद्याप शिल्लक आहेत.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे मंजूर झालेल्या 14.70 कोटी रुपयांच्या निधीपैकी केवळ 15.59 लाख रुपये खर्च झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील मंजूर 40 कामांपैकी एकही काम पूर्ण झाल्याची नोंद नाही. त्यांच्याकडे अजूनही 14.54 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना 14.70 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असताना केवळ 71 लाख रुपये खर्च झाले आहेत. 135 कामांपैकी अवघी दोन कामे पूर्ण झाली असून जवळपास 14 कोटी रुपयांचा निधी वापराविना पडून आहे.
e-Crop Inspection : ई-पीक पाहणीत मोठा बदल; शेतकऱ्यांऐवजी सहायक करणार पीक नोंदणी
वाशिमचे खासदार संजय देशमुख यांना 18.60 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी फक्त 1.41 कोटी रुपये खर्च झाले असून 106 कामांपैकी सातच कामे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या खात्यात अजूनही 17.14 कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांना 19.02 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी 5.02 कोटी रुपये खर्च झाले असून 79 कामांपैकी 28 कामे पूर्ण झाली आहेत. जवळपास 14 कोटी रुपयांचा निधी अद्याप वापरला गेलेला नाही.
परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या बाबतीत तुलनेने जास्त निधी खर्च झालेला असला तरी त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक आहे. मंजूर 14.70 कोटी रुपयांपैकी 3.78 कोटी रुपये खर्च झाले असून 56 कामांपैकी 25 कामे पूर्ण झाली आहेत. सुमारे 10.91 कोटी रुपये अद्याप वापरायचे बाकी आहेत.
या पार्श्वभूमीवर विकास निधी मिळत नसल्यामुळे विकासकामे करता आली नाहीत, हा दावा कितपत योग्य आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांकडूनही या आकडेवारीचा आधार घेत संबंधित खासदारांवर टीका केली जात आहे. दुसरीकडे, पक्षांतराचे समर्थन करणाऱ्या खासदारांकडून मात्र निधी मंजूर होणे आणि प्रत्यक्ष प्रशासकीय प्रक्रियेतून कामे पूर्ण होणे यात फरक असल्याचा युक्तिवाद केला जात आहे.
दरम्यान, सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मात्र विकास निधीच्या वापराबाबत समोर आलेल्या आकडेवारीमुळे पक्षांतरामागे दिल्या गेलेल्या कारणांवर नव्याने राजकीय प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
__








