Sharad pawar ncp’s mp likely to meet PM Narendra Modi today : दोन दिवसांपूर्वीच दिले होते निवेदन; राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण
Mumbai शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ खासदार आज (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ही भेट महाराष्ट्रातील शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांसाठी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला जात असला, तरी या भेटीमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेना भाजपपासून अंतर राखून असताना, राष्ट्रवादीचे नेते वारंवार मोदी व भाजप नेत्यांना भेटत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान मोदींकडे भेटीसाठी निवेदन दिले होते, ज्यानंतर मोदींनी आज त्यांना भेटीची वेळ दिली आहे. तत्पूर्वी, मोदींनी भाजप व एनडीए आघाडीतील सर्व खासदारांसोबत भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत गेलेल्या खासदारांनीही मोदींची भेट घेतली होती. शिवसेना कुणाची, यावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे सेनेच्या खासदारांनी घेतलेल्या या भेटीवर उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी सर्व खासदारांना “घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे” असा संदेश दिला असून, हा संदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दबाव टाकणारा असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांचे खासदार मोदींची भेट घेत आहेत, ज्यावर अद्याप उद्धव ठाकरे किंवा खासदार संजय राऊत यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
Sunil Tatkare : मोठी बातमी… सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह
महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून बेरोजगार व तरुणांचे प्रश्न भीषण झाले आहेत, आणि हेच प्रश्न मोदींकडे मांडणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. या भेटीशी राजकारणाचा संबंध नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे.
असे असले तरी, मागील दोन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज ठप्प आहे आणि ही कोंडी फोडण्यासाठी भाजपच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे, काँग्रेसने जोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा माफी मागित नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. तसेच, महिला आरक्षण आणि मतदारसंघाची फेररचना यांसारखी महत्त्वाची विधेयके संसदेत मांडली जाणार आहेत. या विधेयकांना पाठिंबा मिळवण्यासाठी आणि संसदेची कोंडी फोडण्यासाठी या भेटीगाठी सुरू असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.








