Sanjay Raut accuses the Election Commission of selling the Shiv Sena party for ₹5,000 crore :कपिल सिब्बलांच्या मुद्देसूद युक्तिवादाने उद्धव ठाकरे गटाच्या आशा पल्लवित
Mumbai शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर नेमका हक्क कोणाचा, यावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उद्धव ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी अत्यंत टोकदार आणि मुद्देसूद युक्तिवाद केल्याने ठाकरे गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, या सुनावणीदरम्यान उद्धव सेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर आणि केंद्र सरकारवर केलेल्या अत्यंत गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह बंड केल्यानंतर, आमदारांच्या आणि खासदारांच्या संख्याबळाचा आधार घेत निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला सिब्बल यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. पक्ष कोणाला द्यायचा, हा निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही. विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष हे पूर्णपणे वेगळे असतात. विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणजे मूळ पक्षात फूट पडली, असा याचा अर्थ होत नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
मूळ पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्यानंतरच आमदार विधिमंडळात वेगळा गट स्थापन करू शकतात, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. न्यायालयाच्या आतापर्यंतच्या टिपण्यांवरून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, असा कयास लावला जात आहे.
मात्र, या निकालामुळे एक मोठा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी आपापल्या चिन्हावर विधानसभा, महापालिका आणि नगरपालिका निवडणुका लढवल्या आहेत. अशा परिस्थितीत जर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली गेली, तर संबंधित चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सदस्यत्वाचे काय होणार, हा प्रश्न गंभीर बनला आहे.
या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे व अन्य नेते संयम बाळगून निकालाची प्रतीक्षा करत असताना, खासदार संजय राऊत यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेत निवडणूक आयोगावर थेट आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिवसेना विकण्यात आली आहे. यात भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सर्वाधिक वाटा असून, हा संपूर्ण व्यवहार ५ हजार कोटी रुपयांच्या घरात झाला आहे, असा खळबळजनक दावा राऊतांनी केला.
केवळ शिवसेनाच नव्हे, तर निवडणूक आयोगाने यापूर्वीही देशातील तीन ते चार पक्ष अशाच प्रकारे विकल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत न्यायालय यावर काय टिपणी करते आणि अंतिम निकाल काय लागतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








