baba-amte-anand-niketan-management-amte-family-big-decision-chandrapur : आर्थिक संकटामुळे आमटे परिवाराचा मोठा निर्णय
Nagpur : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने जवळपास सहा दशकांपूर्वी उभारलेल्या ‘आनंद निकेतन’ या शैक्षणिक संस्थेबाबत आमटे परिवाराने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या व्यवस्थापनातून बाजूला होत एखाद्या सक्षम संस्थेकडे आनंद निकेतनच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्याचा पर्याय परिवाराकडून गांभीर्याने विचारात घेतला जात आहे.
आनंद निकेतनच्या शाळा आणि महाविद्यालयासमोर सध्या आर्थिक तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित गंभीर आव्हाने उभी आहेत. संस्थेच्या शैक्षणिक इमारतीची अवस्था मोठ्या प्रमाणात जीर्ण झाली असून, उधई आणि इतर कारणांमुळे इमारतीचे नुकसान झाले आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी या इमारतीची संपूर्ण पुनर्बांधणी करणे अत्यावश्यक असल्याचे आमटे परिवाराने अधिकृत निवेदनातून स्पष्ट केले आहे. या पुनर्बांधणीसाठी तब्बल १११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, संस्थेवर आधीपासून असलेल्या आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेता एवढा मोठा निधी उभारणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याचे परिवाराने म्हटले आहे. त्यामुळे केवळ इमारतीच्या दुरुस्तीपुरता प्रश्न मर्यादित नसून संस्थेच्या भविष्यातील आर्थिक स्थैर्याचाही मुद्दा निर्माण झाला आहे.
Dhananjay Munde : ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…’
पुनर्बांधणीसाठी देणगीदारांकडून निधी उभारण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्याचबरोबर निधी उपलब्ध करून घेण्यासाठी इतर पर्यायांचाही विचार करण्यात आला. मात्र, आवश्यक त्या प्रमाणात निधी उभारण्यात अडचणी येत असल्याने आता आनंद निकेतनची जबाबदारी सक्षम संस्थेकडे सोपवण्याचा मार्ग विचाराधीन आहे. या निर्णयामागे आनंद निकेतन बंद पडू नये आणि तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आर्थिक संकटाचा परिणाम होऊ नये, हा मुख्य उद्देश असल्याचे आमटे परिवाराने स्पष्ट केले आहे. विशेषतः समाजातील उपेक्षित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याच्या बाबा आमटे यांच्या मूळ विचारांना धक्का लागू नये, यासाठी संस्थेची शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे परिवाराचे म्हणणे आहे.
आनंद निकेतन ही आमटे परिवारासाठी केवळ एक शैक्षणिक संस्था नसून बाबा आमटे यांच्या सामाजिक कार्याचा आणि विचारांचा महत्त्वाचा वारसा आहे. त्यामुळे व्यवस्थापनाची जबाबदारी दुसऱ्या संस्थेकडे देण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्याही मोठा आहे. मात्र, सध्याच्या आर्थिक आणि पायाभूत अडचणींच्या पार्श्वभूमीवर केवळ भावनिक भूमिकेपेक्षा संस्थेचे भवितव्य सुरक्षित ठेवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे परिवाराने स्पष्ट केले आहे. आता आनंद निकेतनच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नेमकी कोणत्या सक्षम संस्थेकडे सोपवली जाणार आणि बाबा आमटे यांनी उभ्या केलेल्या या शैक्षणिक वारशाची पुढील वाटचाल कशी होणार, याकडे चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








