I am not worried about the ministerial post, protecting OBCs is important said Chhagan Bhujbal : समता परिषद ही केवळ एक समाजाची नाही, तर समाजातील सर्वच घटकांची
Jalgaon : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण कमी होत आहे. त्यामुळे आरक्षणाची लढाई संपलेली नाही. आम्ही शेवटपर्यंत लढू आणि ओबीसी घटकाचे आरक्षण कमी होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव येथे आयोजित ओबीसी महामेळाव्यात ते बोलत होते.
आमदार राजू भोळे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, बाळासाहेब कर्डक, सुभाष राऊत, सत्संग मुंढे, कल्याण दळे, मुकुंद सपकाळ, दिवाकर गमे, अनिल निकम, वसंत पाटील, विजय महाजन, शंकरराव लिंगे, अनिल महाजन, सतीश महाजन, शाळीग्राम मालकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक यावेळी उपस्थित होते..
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही केवळ एक समाजाची नसून ती समाजातील सर्वच घटकांची आहे. समता परिषदेमध्ये माळी, दलीत, तेली, चांभार, कुंभार, मुस्लिम सर्वच समाजाचे प्रतिनिधी आहेत. अनेकांना वाटत असेल की मंत्रिपदासाठी हा मेळावा घेतला जातो आहे. मात्र सामाजिक काम जो हाती घेतो त्याला त्रास सहन करावाच लागतो. ओबीसी समाज ५४ टक्के आहे. मात्र तो फार मागास राहिला आहे.
chhagan bhujbal : महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ, भुजबळांच्या प्रयत्नांना यश
ओबीसींच्या मुद्द्यावर आपण महाराष्ट्रात प्रचंड मेळावे घेतले आहेत. ५-५ लाख समुदायाचे आपण या अगोदर मेळावे घेतले आहेत. दिल्लीत मेळावे घेतले आहेत. रामलीला मैदानावरदेखील आपण मेळावे घेतले. बीडमध्ये ज्यावेळी हॉटेल, घर जाळण्यात आली, घरांवर हल्ले झाले, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांचे घर जाळले. सगळ्याची राख रांगोळी केली होती. त्यानंतर मी ठरवले आता शांत बसणार नाही. त्यानंतर सर्वात अगोदर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मग अंबडला पहिली सभा घेतली. त्यामुळे मला मंत्रिपदाची चिंता नाही, असे भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्राला देशभरात पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी रचला. महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी १८४८ ला भिडेंच्या वाड्यात शाळा सुरु केली. ज्यावेळी महिलांना अस्पृश्यांसारखी वागणूक देण्यात येत होती, त्यावेळी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत महात्मा फुले यांनी शाळा चालवल्या.
Manikrao Kokate : कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले, 1 एप्रिलपासूनअंमलबजावणी
महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीत तात्यासाहेब भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे आदी सहकारी सहभागी होते. सावित्रीबाईंना फातिमा शेख, गणू शिवाजी मांग व धुराजी आप्पाजी चांभार या शिक्षकांनी सहकार्य केले. लहूजी वस्ताद साळवे आणि रानाबा महार हे त्यांच्या पाठीशी हिमतीने उभे राहिले.
आपल्या कार्यासाठी एक व्यापक संस्था असावी, यासाठी महात्मा फुले यांनी २४ नोव्हेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जोतीराव ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. जोतिरावांच्या नंतर सत्यशोधक समाजाची जबाबदारी सावित्रीबाईंनी उचलली आणि यशस्वीरित्या पार पाडली, असेही भुजबळ यांनी सांगितले.