Harshawardhan Sapkal : शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा !

 

Harshvardhan Sapkal said, it is the people’s money, not that of Manikarao Kokate’s : हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, जनतेचा पैसा आहे, माणिकाराव कोकाटेच्या घरचा नाही

Mumbai : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजप महायुती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

माणिकराव कोकाटेंच्या त्या वक्तव्यानंतर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, शेतकऱ्यांना भिखारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का, असा अजब प्रश्न विचारून पुन्हा एकदा अपमान केला आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कोकोटेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्या. हा अपमान आता सहन केला जाणार नाही.

सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते, ते अद्याप पाळलेले नाही, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, असे सरकार म्हणते, त्यात कर्जमाफीवरून कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे. शेतकऱ्याला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी करते म्हणजे काही उपकार करत नाही. तो जनतेचा पैसा आहे, कोकाटेच्या घरचा नाही. सरकारची धोरणे जर शेती व शेतकऱ्याला अनुकुल असती तर शेतकरी सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहिल?

Harshawardhan Sapkal : अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाटला !

भाजप महायुती सरकार शेतकरीविरोधी आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. मुठभर उद्योगपतींना १६ लाख कोटींचे कर्जमाफ केले तेव्हा असा प्रश्न विचारण्याची धमक कोकाटे किंवा सरकारने दाखवली नाही. मग शेतकऱ्यांनाच प्रश्न विचारण्याची हिंमत का होते? कोकाटेंनी यापूर्वीही भिखारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतक-यांना एक रुपयांत विमा देतो, असे वक्तव्य करून शेतक-यांचा अपमान केला होता. सातत्याने शेतक-यांचा अपमान करण्याचा रोग या महोदयांना जडला आहे. त्यांनी राज्यातील शेतक-यांची माफी मागावी, असे सपकाळ म्हणाले.

Harshawardhan Sapkal : फडणविसांना अतिरिक्त काम झेपत नाहीये

मंत्र्यांनी बोलताना तारतम्य बाळगावे, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे वर्तमानपत्रात वाचले. पण हे मंत्री मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत. वाट्टेल ते बरळतात. फडणवीस सरकारमध्ये एक-एक मंत्री नमुना आहे, असे आम्ही म्हटले होते. माणिकराव कोकाटे हा त्यातीलच एक नमुना आहे, अशा मंत्र्यांना आवर घालावी. शेतमालाला भाव नाही, हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे, शेतकरी संकटात असून दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे. त्याची कृषी मंत्री वा भाजप महायुती सरकारला लाज वाटत नाही. पण उलट शेतकऱ्यांनाच अजब प्रश्न विचारता. हा सत्तेचा माज शेतकरी नक्की उतरवतील हे लक्षात ठेवा, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे.