manoj-jarange-patil-indefinite-hunger-strike-for-maratha-reservation-10-demands-antarwali-sarati : अंतरवाली सराटीतून सरकारसमोर ठेवल्या 10 प्रमुख मागण्या
Mumbai : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकारकडून मागण्यांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने अखेर त्यांनी उपोषणाचा निर्णय कायम ठेवला.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अंतरवाली सराटी येथे भेट देत जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी जवळपास दीड तास चर्चा केली. या बैठकीत कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेट, मराठा आरक्षण आणि शिंदे समितीच्या कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. मात्र सरकारकडून समाधानकारक आश्वासन मिळाले नसल्याचे सांगत जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर दहा प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. मराठवाड्यातील सर्व मराठा समाजबांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि मिरज संस्थानांबाबत 1994 च्या धर्तीवर शासन निर्णय काढावा, आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना महावितरण आणि एमआयडीसीमध्ये नोकरी देण्यासाठी शासन निर्णय जारी करावा, सारथी संस्थेच्या सर्व योजना पुन्हा सुरू कराव्यात, महामंडळाच्या प्रलंबित परताव्यांचे तातडीने वितरण करावे, कुणबी प्रमाणपत्रधारकांना वैधता प्रमाणपत्र द्यावे, मराठा उपसमिती बरखास्त करावी, स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करावे तसेच शिंदे समितीला मुदतवाढ देऊन ऐतिहासिक नोंदींची अधिक व्यापक तपासणी करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी यापुढे सरकारला अतिरिक्त वेळ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, राज्यातील विविध भागांतून या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला जात आहे. कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकासमोर आंदोलन करून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यात येणार आहे. तसेच सातारा गॅझेटप्रमाणेच कोल्हापूर गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदींचाही आरक्षण प्रक्रियेत विचार करावा, अशी मागणीही करण्यात येणार असल्याची माहिती समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
Mlc election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच ‘दगाफटका’ची भीती
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींना वेग आला असून सरकार या आंदोलनावर कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा निर्णायक संघर्षाची चिन्हे दिसत असून पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.








