Congress Leader Vijay Wadettiwar Takes on Cooperation Minister Babasaheb Patil : नागपूरच्या रस्त्यांवर उतरले पिवळे वादळ
Nagpur : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी देशोधडीला लागला आहे. असे असताना या सरकारमधील सहकार मंत्री म्हणतो की ‘शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली आहे. आम्ही निवडणुकीत आश्र्वासन देत असतो..’ यातून सरकारची खरी नियत दिसत आहे. हे सरकार एकीकडे समाजा-समाजांत भांडणे लावत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना भिकेला लावत आहे. यांना शेतकरीच जागा दाखवतील, असे म्हणत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला.
आज (१० ऑक्टोबर) नागपुरात ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या सभेला वडेट्टीवार संबोधित करत होते. ते म्हणाले, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाला EWS चे आरक्षण मिळाले तेव्हा आम्हीच पाठींबा दिला. स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला द्यावे. पण ओबीसींमधूनच आरक्षण पाहिजे, हा जो अट्टाहास आहे, त्याला आमचा विरोध आहे.
OBCs’ Fight for Justic : आमची मागणी ऐकली नाही, तर मुंबई, ठाणे, पुणे सर्वच जाम करू !
ओबीसी समाजातील लोकांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वर्ष लागते, येथे मराठा समाजाला एका तासात प्रमाणपत्र दिली जात आहेत. हा सरळसरळ अन्याय आहे. आम्ही कुणाच्या धमक्यांना घाबरत नाही, आम्ही लढत राहणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी आजच्या मोर्चात मांडली.
Rane Vs Pathan : वातावरण खराब झालं तर सभा बंद कराव्या लागतील !
रस्त्यांवर उतरले पिवळे वादळ..
विदर्भाच्या विविध जिल्ह्यांतील सकल ओबीसी संघटनांनी आजच्या मोर्चाची तयारी केली होती. यशवंत स्टेडीयममधून दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मोर्चाला सुरूवात झाली. पंचशील चौक, व्हेरायटी चौक येथून मोर्चा हळूहळू संविधान चौकाच्या दिशेने निघाला. मोर्चेकरी पिवळे झेंडे घेऊन होते. नागपुरच्या रस्त्यांवर आज पिवळे वादळ आल्याचा भास होत होता. ‘जय ओबीसी’, ‘जय संविधान’, ‘ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे’, अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले होते.
आजच्या मोर्चात खासदार प्रशांत पडोळे, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, आमदार रामदास मसराम, यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख, रासपचे महादेव जानकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आदी सहभागी झाले होते.








