Devendra Fadnavis will be union education minister, Sanjay Raut claims again : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दांत टीका
Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दिल्लीच्या वर्तुळात खळबळ उडवून देणारा दावा उद्धव सेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच केंद्र सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याचा व त्यांना केंद्रात पाठवून शिक्षण खाते त्यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचा दावा राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले कोणी कितीही नकार दिला किंवा यावर कितीही स्पष्टीकरणे आली, तरी माझी माहिती पक्की आहे. त्यांनी फडणवीस यांच्या प्रशासनिक कौशल्याचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस हे एक उत्तम प्रशासक आणि अनुभवी मंत्री आहेत. याच गुणवत्तेमुळे भाजप त्यांना आता दिल्लीत पाठवण्याच्या तयारीत आहे, असे राऊत म्हणाले. देशातील तरुणांना एक उत्तम आणि सक्षम शिक्षण मंत्री मिळो, हीच तरुणांची तीव्र इच्छा आहे, असा टोलाही त्यांनी याद्वारे लगावला.
संजय राऊत यांच्या स्फोटक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात यावर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राऊत यांनी हाच दावा केला होता. मात्र ते सपशेल फोल ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा तो फेटाळून लावला होता.
यावेळी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कडक शब्दांत हल्लाबोल केला. देशातील तरुणांनी पंतप्रधान मोदींचा पराभव केला आणि त्यांना नमवले. याच तरुणशक्तीच्या दबावामुळे व संघर्षापुढे केंद्र सरकारला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला, असे सांगत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील मुद्द्यावरून केंद्राला धारेवर धरले.
Uddhav Thackeray : शिवसेनेचं चिन्ह आपल्यालाच मिळणार; नाही तर ते गोठवलं जाईल
सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनस्र्पर्कावर भाष्य करताना संजय राऊत यांनी उपरोधिक टीका केली. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी कुठेच प्रत्यक्ष जनमानसात दिसत नाहीत. ते आता थेट ऑनलाईन पंतप्रधान झाले आहेत, असे म्हणत त्यांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.








