Gondia water storage is being affected : उन्हानं पेटलं गोंदिया; पाणी साठ्यावर होतोय परिणाम
Gondia जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असून, त्याचा थेट परिणाम पाणीसाठ्यावर होऊ लागला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे, नद्या, तलाव आणि विहिरी यांमधील जलस्तर सातत्याने घसरत आहे. विशेषतः बाष्पीभवनाच्या वेगामुळे साठवलेलं पाणी झपाट्याने कमी होत असून, येत्या मे-जून महिन्यात पाणीटंचाई गंभीर रूप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे, मात्र या उपाययोजनांवर खर्च वाढल्याने नागरिकांच्याच खिशाला चटका बसणार आहे. गोंदिया शहरासह दोन गावांना पाणीपुरवठा करणारी वैनगंगा नदी उन्हाळ्याच्या झळांमुळे जवळपास कोरडी पडली आहे.
परिणामी, आता पुजारीटोला जलप्रकल्पातील पाणी वळवून पूरक पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, या जलप्रकल्पातील साठाही केवळ ३३.२५ टक्क्यांवर आल्याने, पुढील दोन महिने कसाबसा निभाव लागणार, अशी परिस्थिती आहे. सिरपूर प्रकल्पातील साठा तर केवळ २.५९ टक्के आहे. या आकड्यांवरून स्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट दिसून येते.
Unseasonal Rain : अवकाळीचा उद्रेक; गारपिटीनं मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं,
जिल्ह्यात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू नसला तरी प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. नगरपरिषदेने टँकरसाठी ठेकेदार नियुक्त केले असून, गरज पडल्यास तात्काळ पुरवठा सुरू करता येईल, अशी माहिती मिळते. मात्र, टँकरपुरवठ्याचा खर्च मोठा असल्याने, शासनाच्या निधीवर आणि नागरिकांच्या करभारावर त्याचा ताण येणार आहे.
जिल्ह्यातील बहुतांश गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणी दिलं जातं. यामध्ये धरण, तलाव व नद्यांमधून पाणी उचलून गावांमध्ये पुरवठा केला जातो. मात्र, जलसाठ्यातील घट आणि वाढत्या मागणीमुळे या योजनांवरही ताण आला आहे. त्यामुळे काही गावांना नियमित पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.
पाणीसाठा आकडेवारी (५ मे २०२५)
कालीसरार : ३५.२९%
सिरपूर : २.५९%
पुजारीटोला : ३३.२५%
इटियाडोह : १८.४१%