Failed in 12th exam, committed suicide on birthday : बारावीच्या निकालातील अपयशामुळे उचलले टोकाचे पाऊल
Amgao शैक्षणिक अपयशाने ग्रासलेल्या एका कोवळ्या मनाने आपल्या आयुष्याचा दोरच कापला. बारावीच्या निकालात अपयशी ठरल्याने कृष्णा धरम शिवनकर (वय १८), रा. बजरंग चौक, आमगाव या विद्यार्थ्याने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ७ मे रोजीच त्याचा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्याने आयुष्याचा शेवट केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कृष्णा स्वभावाने शांत, अभ्यासू आणि कुटुंबाशी नातं जपणारा मुलगा म्हणून परिचित होता. यावर्षी त्याने बारावीची परीक्षा दिली होती. ६ मे रोजी निकाल लागल्यानंतर त्याला अपयशाचा सामना करावा लागला. अपयशाचा मानसिक धक्का त्याला पचवता आला नाही. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या कृष्णाने मंगळवारी (७ मे) दुपारी दोनच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून आयुष्य संपवले.
MLA Chainsukh Sancheti : पाणीपुरवठ्यात दिरंगाई; आमदार संचेती आक्रमक
गंभीर बाब म्हणजे, मंगळवारचा दिवस कृष्णाचा वाढदिवस होता. केक, शुभेच्छा आणि हास्याने भारलेला दिवस असायला हवा होता. मात्र हा दिवस अश्रूंनी भरलेला ठरला. वडील धरम शिवनकर व कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेजारी व मित्रपरिवार सुद्धा हादरला आहे. या घटनेमुळे संपूर्ण आमगाव शहर शोकाकुल झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत.
Vidarbha Farmers : शेतकरी भावंडांनी स्वखर्चातून उभारला शेतरस्ता!
या दुर्दैवी घटनेनंतर शैक्षणिक अपयशामुळे होत असलेल्या आत्महत्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांवर वाढणारा अभ्यासाचा ताण, अपेक्षांचं ओझं आणि अपयशाची भीती त्यांना नैराश्याच्या गर्तेत लोटत आहे. समाजात, पालकांमध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रात या विषयावर संवेदनशीलतेने विचार होण्याची गरज प्रकर्षाने जाणवते.