Sudhir Mungantiwar’s heart was broken when three MBBS students drowned : सरकारच्या मदतीने दुःखात कुटुंबीयांना थोडा तरी दिलासा मिळेल
Chandrapur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या ३५ ते ४० वर्षातील आपल्या समाजकारण आणि राजकारणात विकासाची दूरदृष्टी ठेऊन कामे केली, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. विकासासाठी जेवढे धडाडीने निर्णय ते घेतात, तेवढेच ते मनाने हळवेसुद्धा आहेत. कुणाचेही दुःख बघून त्यांचे मन लगेच द्रवते. त्यांच्या हळव्या मनाची अनुभूती पुन्हा एकदा आली.
नुकत्याच घडलेल्या एका अपघाती घटनेने आमदार मुनगंटीवार यांच्यातील संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचे तीन विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेले होते. बुलढाण्याचा गोपाल गणेश साखरे, शिर्डीचा पार्थ बाळासाहेब जाधव आणि छत्रपती संभाजी नगरचा स्वप्नील उद्धवसिंह शिरे हे तीन विद्यार्थी होते. काल (१० मे) या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. या तिघांनीही वैद्यकीय शिक्षणाला नुकतीच सुरूवात केली होती. डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचे तिघांचेही स्वप्न होते. त्यासाठीच तिघांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला होता. पण नियतीला ते मंजूर नव्हते. क्रूर काळाने त्यांच्यावर आघात केला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय दुःखात बुडालेले आहेत.
Honor of the District Collector : सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्हा पुन्हा अव्वल !
मृत्यूची किंमत पैशांमध्ये लावता येत नाही. कितीही पैसा लावला तरी गेलेला जीव परत आणता येत नाही. पण तरीही मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत झाल्यास त्यांना दिलासा मिळतो, असे माननारे आमदार मुनगंटीवार यांनी तिन्ही मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला. या दुःखद घटनेच्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर तात्काळ सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मृत विद्यार्थ्यांचा मित्रपरिवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला आघात फार मोठा आहे. सरकारच्या मदतीने या दुःखात त्यांना थोडा तरी दिलासा मिळावा, अशी भावना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासोबतही यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.