Ranjit Patil steps up campaign for the Teachers’ Constituency election, raising the issue of a Special TET : टीईटीच्या अटींमुळे सेवेत असलेले राज्यातील शिक्षक चिंतेत असल्याचे विधान
Akola आगामी विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना पुन्हा राजकीय धार मिळू लागली आहे. सेवेतील शिक्षकांसाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर स्वतंत्र विशेष शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिक्षकांच्या महत्त्वाच्या मागणीला पुन्हा एकदा वाचा फोडली. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या राजकारणात या मुद्द्याची चर्चा सुरू झाली आहे.
अकोला येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) आयोजित सत्कार समारंभात बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, टीईटीच्या अटींमुळे राज्यातील अनेक सेवेत असलेले शिक्षक चिंतेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ऑगस्ट २०२८ पर्यंत मुदत असली, तरी सेवेत कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र विशेष टीईटी परीक्षा घेणे आवश्यक आहे. यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, आपण त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जवळ येत असताना टीईटी, सेवासुरक्षा आणि पदोन्नती यांसारखे प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी येत आहेत. अशा परिस्थितीत डॉ. रणजित पाटील यांनी विशेष टीईटीचा मुद्दा पुढे करून शिक्षकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कार्यक्रमात शिक्षक परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक संतोष इंगळे, नवनिर्वाचित केंद्रप्रमुख रूपेश सूर्यवंशी, प्रकाश साबळे, राहुल अडगावकर आणि ज्ञानदीप मानकर यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ह.भ.प. रामदयाल इंगळे होते. शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर, नगरसेवक पंकज गावंडे, दिलीप वाहूरवाघ, शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष शशिकांत गायकवाड, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी अभिजित बन्नोरे, विवेकानंद सावत, जिल्हाध्यक्ष सचिन काठोळे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.








