palanquin of Gajanan maharaj depart for Pandharpur Wari : ५६व्या वर्षी श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीसाठी प्रस्थान
Shegaon “गण गण गणात बोते, ज्ञानोबा-तुकाराम!” या गजरांनी आणि टाळ-मृदंगाच्या निनादांनी संतनगरी शेगाव आज विठ्ठलमय झाली हाेती. संत गजानन महाराज संस्थानच्या श्रींच्या पालखीचे ५६वे पंढरपूर वारीसाठीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झाले.
या पवित्र पालखी सोहळ्यात ७०० पेक्षा अधिक वारकरी, रथ, अश्व, मेणा, पताकाधारी सहभागी झाले आहेत. ३३ दिवसांच्या या पायी प्रवासात श्रींच्या नामस्मरणात ७२५ किमीचा भक्तिपथ पार केला जाणार आहे. ४ जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे पोहोचणार असून, ९ जुलैपर्यंत श्री गजानन महाराज संस्थानच्या स्थानिक शाखेत मुक्काम राहील.
Mahayuti Government : रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार !
त्यानंतर १० जुलैपासून परतीचा प्रवास सुरू होईल. ३० जुलै रोजी खामगाव मुक्कामानंतर ३१ जुलै रोजी पुन्हा शेगाव नगरीत आगमन होईल. आजच्या प्रस्थानदिनी पालखी दुपारी श्रीक्षेत्र नागझरी येथे पोहोचेल. तेथे महाप्रसादानंतर रात्री पारस येथे मुक्काम होईल. ३ जुलैला पारसहून भौरद व ४ जुलैला अकोला येथे दोन दिवसांचे थांबे असतील.
वारीचा संपूर्ण मार्ग भक्तिरसात न्हालेला असतो. ही केवळ धार्मिक यात्रा नसून, सामाजिक एकतेचे, नि:स्वार्थ सेवेचे व भक्तीभावाचे प्रतीक आहे. ३३ दिवसांचा हा प्रवास भक्तीचा परीघ रुंदावणारा ठरतो. वाटेवर भक्तांच्या स्वागतासाठी गावोगाव भाविक सज्ज असतात. गावातील वेशीवर निरोप देणाऱ्या हजारो हातांनी आणि डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंनी हा सोहळा अधिकच भावस्पर्शी होतो. शेगावची ही पालखी शिस्तप्रियतेसाठी प्रसिद्ध आहे. संयम, सेवा, प्रेम आणि श्रद्धा यांचा संगम असलेल्या या वारीत प्रत्येक वारकरी संतांच्या कृपेचा अनुभव घेतो.