Remove Agriculture Minister Kokate from the cabinet : शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकरांची राज्यपालांकडे तक्रार
Akola राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सतत शेतकऱ्यांविरोधात अवमानकारक वक्तव्य करत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. कृषीमंत्रीपदाच्या जबाबदारीला भान न राखता केलेली ही विधाने शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानावर आघात करणारी आहेत. असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
दातकर यांनी दिनांक २ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीची जाण मंत्री ठेवत नाही. मुला-मुलींच्या लग्नासाठीही विमा व अतिवृष्टी मदत दिली जाते का? मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. कृषीमंत्र्यांनी ‘भिकाऱ्याला १ रुपये मिळतात, आम्ही शेतकऱ्यांना १ रुपये देतो’ असे विधान करणे हे अपमानास्पद आहे.”
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री करतील तीन हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
शिवसेना जिल्हाप्रमुख दातकर यांनी कोकाटे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांना तत्काळ मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी राज्यपालांकडे केली. त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांचा विश्वासघात होत असून, असंवेदनशील व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. आज शेतकरी बियाणे व खताच्या लिंकिंगमुळे हैराण झालेले आहेत. कृषीमंत्र्यांना या प्रकाराकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही.
शेतकऱ्यांना पाहिजे असलेले बियाणे व खते या राज्यात मिळत नाही, फक्त कंपन्यांच्या मर्जीनुसार व्यवहार सुरू आहे,असा आरोप करीत, याकडे लक्ष द्यायला या कृषीमंत्र्यांना वेळ नसल्याचे दातकर यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा न जाणता बेताल वक्तव्य करणारे कृषीमंत्री दादा भुसे यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख दातकर यांनी केली आहे. या निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.