MNS to send a warning letter to schools : सरकारच्या दबावाला बळी पडू नका, शाळांना पत्र पाठवण्याची तयारी
Buldhana केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या थेट आदेशानंतर, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळांना हिंदी शिकवण्यासंबंधी मनसेकडून कडक इशारा देणारे पत्र पाठवले जाणार असल्याचे स्पष्ट वक्तव्य मनसेचे जिल्हा नेते अमोल रिंढे पाटील यांनी केले आहे.
राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात परखड भूमिका घेत “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती केवळ उत्तर भारतातील काही राज्यांची भाषा आहे. महाराष्ट्रावर ती लादण्याचा कुठलाही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला आहे. राज्यात एप्रिलपासून अभ्यासक्रमासंबंधी गोंधळ सुरू आहे. इयत्ता पहिलीपासून तीन भाषा — मराठी, इंग्रजी आणि हिंदी — शिकवण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पुढे केला.
Local Body elections : स्थानिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी ‘ॲक्शन मोड’मध्ये!
त्याविरोधात मनसेने पहिल्यापासूनच जोरदार आक्रमण केलं. जनमताचा रेटा पाहून सरकारने ‘हिंदी सक्ती नाही’ असं सांगत पळवाट काढली. पण यामागे छुपा अजेंडा असल्याचा संशय आता बळावला आहे. मनसे नेते अमोल रिंढे यांचा आरोप आहे की, “शालेय पुस्तक छपाईचे काम सुरू आहे, याचा अर्थ सरकार अदृश्य मार्गाने हिंदी लादण्याचा डाव आखतेय. आम्ही अशा कोणत्याही निर्णयाला विरोध करू. जिल्ह्यातील सर्व शाळांनी सरकारच्या दबावाला बळी पडू नये. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.”
राज ठाकरे यांच्या मते, “ही भाषा सक्ती केवळ मुलांचे नव्हे तर मराठी संस्कृतीचेही नुकसान करणारी आहे. महाराष्ट्रात मराठी व जागतिक स्तरावर उपयुक्त असलेली इंग्रजी हीच दोन भाषा पुरेश्या आहेत. हिंदीसारख्या भाषेचा अतिरेक म्हणजे सांस्कृतिक अतिक्रमण आहे.”
AYUSH Ministry : आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे हजारो महिलांवर उपासमारीची वेळ!
मनसेच्या म्हणण्यानुसार, ही भाषा सक्ती म्हणजे उत्तर भारतीय मानसिकतेचा प्रभाव रोपवण्याचा कारस्थान आहे. थेट किंवा आडवळणाने हिंदी लादून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रचनेवर परिणाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे आता जिल्ह्यातील सर्व शाळांना अधिकृत पत्र पाठवून हिंदी सक्तीला विरोध करण्याचा आग्रह धरणार आहे. शाळांनी जर जबरदस्तीने हिंदी शिकवण्याचा प्रयत्न केला, तर त्यास मनसे जोरदार विरोध करेल, असा इशारा अमोल रिंढे पाटील यांनी दिला आहे.