Breaking

Burden of career : पालकांच्या अपेक्षांचं ओझं मुलांना होतय जड!

Parents’ ambition to make children doctors and engineers is proving to be dangerous : डॉक्टर, इंजिनीयर करण्याचा अट्टाहास ठरतोय घातक

आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, उच्चपदस्थ अधिकारी व्हावे, अशी सर्वसामान्य पालकांची अपेक्षा असते. पालक त्यासाठी मुलाच्या लहान वयापासून काळजी घेत असतात. सुरुवातीलाच मुलांना नामवंत शाळेत, प्रचंड शुल्क भरून दाखल करतात. माझा मुलगा किंवा मुलगी कोणत्या शाळेत शिकते, हा पालकांचा प्रतिष्ठेचा विषय होऊन जातो. मुलांच्या आवडीनिवडीचा विचार न करता त्यांना लहानपणापासून मोठी स्वप्न दाखवली जातात. आई-वडिलांची इच्छा आणि आजूबाजूचे वातावरण पाहून मुले आपणही त्यासाठी तयार आहोत असे समजतात.

प्रत्येक पाल्य या प्रचंड खर्चिक आणि बौद्धिक स्पर्धेसाठी तयार असतोच असे नाही. पण त्यापुढे दुसरा विचारही येऊ नये अशी आपली व्यवस्था आहे आणि यातूनच मग प्रतिष्ठेसाठी मुलांना डॉक्टर ,इंजिनिअर करण्यासाठी पालक जिवाचा आटापिटा करतात. अशाच प्रकारातून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली. दहावीला 92 टक्के गुण मिळालेल्या मुलीने डॉक्टर व्हावे यासाठी, एका मुख्याध्यापकाने स्वतःच्या मुलीला शिकवणी लावली. बारावीच्या अभ्यासक्रमाची ही सुरुवात होती मात्र यातच घेतलेल्या एका चाचणी परीक्षेत मुलीला कमी मार्क मिळाले म्हणून याच मुख्याध्यापक पित्याने तिला लाकडाच्या दांडक्याने बेदम मारले आणि त्यातच तिचा जीव गेला.

Bacchu Kadu : बच्चू कडूंना उच्च न्यायालयाचा दिलासा!

मन सुन्न करणाऱ्या या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. पाल्यांचे भवितव्य हे त्याच्या भावी सुकर जीवनासाठी आहे की, पालकांच्या प्रतिष्ठेसाठी का पालकांना सतावणाऱ्या त्याच्या भवितव्यासाठी हा प्रश्न निर्माण होतो. याच व्यवस्थेतून आज शैक्षणिक क्षेत्राचा खेळ खंडोबा झाला आहे. अनेक प्रश्न आहेत, मुलगा सातवीला गेल्यापासून त्याला मोठ्या शिक्षणाच्या तयारीसाठी, कोवळ्या वयापासून ट्युशन नावाच्या भस्मासुरत ढकलले जाते. ट्युशन वाईट सांगणारे आता ट्युशनशिवाय पर्याय नाही म्हणून लागले आहेत. हे आपल्या बदललेल्या मानसिकतेचं स्वरूप आहे .

बारावीपर्यंत ट्युशन नको असा निर्णय घेणारे, घेतलेल्या निर्णयाला विसरून शिक्षण क्षेत्रात घुसलेल्या ट्युशनच्या भस्मासुराला खतपाणी घालत आहेत. ट्युशन हेच मुलांचे भवितव्य असेल, तर मग शाळा कॉलेज नावाच्या व्यवस्थेचा फार्स कशासाठी? चिमुकल्या पाल्यांना फक्त घुमवण्यासाठीच आहे का? मुलाच्या भवितव्यासाठी त्याची इच्छा अपेक्षा आणि पात्रता न तपासता त्याला एका गूढ चक्रात ढकलले जाते. तोही त्यात भरडला जातो. मुलगा बारावी होत नाही, तर त्याला त्याच्या मेडिकल, इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी, कौन्सिलिंग नावाची लाखो रुपये घेणारी नवी व्यवस्था ही इथेच विकसित झाली आहे. अशा व्यवस्थांवर लाखो उधळत पालक पाल्यांना कोणत्या व्यवस्थेत ढकलत आहेत .

Praful Gudadhe : मुख्यमंत्र्यांनीच दक्षिण-पश्चिमच्या निवडणुकीत घोळ केला

आज शैक्षणिक क्षेत्रात ना शिक्षक, ना शिक्षण संस्थाचालक, ना विद्यार्थी, ना पालक कोणीच खुश नाही प्रत्येकांच्या समस्या वेगळ्या आहेत. एकीकडे सेव्हन स्टार शिक्षण व्यवस्था विकसित झाली आहे. पाल्यांच्या पात्रतेचा, आवडीचा विचार न करता लादलेल्या उच्च शिक्षणामुळे, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. हा चिंतेचा विषय नाही का? तर दुसरीकडे जगण्याच्या संघर्षात पुस्तक काखेत बांधून शिकणारा चांगले यश मिळवत आहे .मनापासून केलेल्या कष्टाला उच्च यश मिळते, असे समाजातील अनेक उदाहरणं समोर आलेले आहेत. त्यांना ट्युशन तर सोडाच दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतानाही ते यश मिळवू शकतात, तर आपण का नाही? हा पालकांना निर्माण झालेला न्यूनगंड आहे का? यावर गांभीर्याने विचार करून पाल्यांना आधी माणूस म्हणून उभं करण्यासाठी आपण विचार करणार आहोत का? हाच मोठा प्रश्न आहे.

  • सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)

    २७ वर्षांपासून विविध राज्यस्तरीय दैनिकांमध्ये रिपोर्टरपासून कार्यकारी संपादक पर्यंतचा विस्तृत अनुभव. डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात ही यशस्वी योगदान.