Unnecessary expenses for the chairmen and members of the legislative committees of estimates Congress’s accusation : गरीब शेतकऱ्यांसाठी थोडी कणव दाखवली असती, तर आशीर्वाद भेटले असते
Nagpur : संसद आणि विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांच्या भोजनासाठी शाही बेत आखण्यात आला. प्रत्येक सदस्यासाठी साडेचार हजार रुपये खर्च करण्यात आले. ५५० रुपये भाडे असलेल्या चांदीच्या ताटात जेवण वाढण्यात आले. तर मेन्यूची किंमत होती चार हजार रुपये. साडेचार या सदस्यांनी हजार रुपयांचं नेमकं काय खाल्लं असेल? राज्यावर १० लाख कोटींचं कर्ज आहे. अशा परिस्थितीत सरकार विनाकारण उधळपट्टी करत आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
विजय वडेट्टीवार यांनी आज (ता. २५ जून) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्य आर्थिक संकटात सापडलं आहे. सरकार श्रीमंत असल्याचा आव आणत आहे. केवळ दिखावेगीरी सुरू आहे. चांदीच्या ताटात शाही जेवण देऊन सरकारला काय सिद्ध करायचे आहे? राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना हे योग्य नाही. यापेक्षा थोडीशी जरी कणव गरीब शेतकऱ्यांप्रति दाखवली असती, तर त्यांना आशीर्वाद भेटले असते.
शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं वचन पूर्ण केलं नाही. विदर्भातील ५८ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज मिळालं नाही. त्यात जुनं कर्ज भरण्याची सक्ती केली जात आहे. धान उत्पादक जिल्ह्यांसाठी बोनसची घोषणा केली. मागील खरीपाच्या हंगामात ही घोषणा केली होती. पण नवा खरीप हंगाम येऊनही बोनस दिलेला नाही. सहा महिन्यांपासून निराधारांना पैसे दिले नाहीत. कोतवालांचे मानधन चार महिन्यांपासून थकीत आहे. शासनाच्या अनेक विभागांचे पगार १० ते १२ दिवस उशीराने होत आहेत. अन् सरकार दिखावेगिरीत गुंतले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
Vijay Wadettiwar : अबू आझमी आणि भाजप – एका नाण्याच्या दोन बाजू !
शरद पवार हिंदी सक्तीच्या विरोधातच..
गुजरातमध्ये मराठीची सक्ती होत नाही, हिंदीची सक्ती होत नाही. केवळ महाराष्ट्रावरच का होते? इंग्रची आणि हिंदीची सक्ती होत आहे. हे सर्व कुणाला खुष करण्यासाठी केलं जात आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. शरद पवार हिंदी सक्तीच्या विरोधात आहेत. पण अजित पवार यासाठी आग्रही का झाले नाहीत, कॅबिनेटमध्ये चर्चा का घडवून आणली नाही, असेही प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.