Congress leader Vijay Wadettiwar demands Rs 10 lakh compensation if farmers die due to lightning : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांचे आश्वासन
Mumbai : मानव – वन्यजीव संघर्ष वाढीस लागलेला असताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांची मदत शासनातर्फे मृताच्या कुटुंबीयांना केली जाते. पण वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाल्यास फक्त चारच लाख रुपयांची मदत केली जाते, असे का? शेतकरी किंवा शेतमजुराचा मृत्यू झाल्यास त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी किंवा शेतमजुराच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधानसभा सभागृहात तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, तसे पाहिले तर पैशांनी कोणत्याही जिवाची हानी भरून काढता येत नाही. पण घरातील कर्त्या पुरूषाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पुढील आयुष्य सावरण्यासाठी मदतीची रक्कम कामी येते. त्यामुळे ही रक्कम समाधानकारक असली पाहिजे. शेतकरी किंवा शेतमजुराचा वीज कोसळून मृत्यू झाल्यास देण्यात येणारी चार लाख रुपयांची रक्कम वाढवून १० लाख करण्यात यावी.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी वडेट्टीवारांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर दिले. ते म्हणाले, राज्य आपत्ती व्यवस्थापनामध्ये आधी वीज कोसळून मृत्यू झाल्यास मदत देण्याच्या बाबीचा समावेश नव्हता. पण आता त्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी मदत निधी वाढवून देण्याबाबत सुचनांचा विचार करू. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन मंत्री गिरीष महाजन यांनी दिले. महाराष्ट्रात वीज पडून वर्ष २०२२ मध्ये २३६ मृत्यू झाले आहेत. तर २०२३ मध्ये १८१ इतकी मनुष्यहानी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले.