Pandan Road Study Group will change the livelihood of farmers : अतिक्रमणमुक्त आणि बारमाही वापरायोग्य रस्त्यांची निर्मिती करणार
Mumbai : शेतमालाची वाहतूक आणि यांत्रिकीकरणाला चालणा देण्यासाठी आणि शेत पांदण रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हा अभ्यासगट महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
शेत पांदण रस्त्यांच्या मजबुतीकरणामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल बाजारात पोहोचवणे सोयीचे होईल. यांत्रिकीकरणालाही चालना मिळेल. या अभ्यासगटाचे नेतृत्व महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव करतील. या अभ्यास गटामध्ये विविध विभागांतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
अपर मुख्य सचिव – जलसंपदा, अपर मुख्य सचिव – सार्वजनिक बांधकाम, प्रधान सचिव – ग्रामविकास, प्रधान सचिव – व्यय, वित्त विभाग, सचिव / प्रधान सचिव – रोजगार हमी योजना, यशदाचे महासंचालक निरंजनकुमार सुधांशु, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, तसेच विधी व न्याय विभागाचे सह / उप सचिव यांचा सदस्य म्हणून या अभ्यासगटात समावेश असेल. महसूल व वनविभाग हे सदस्य सचिव असणार आहेत.
हा अभ्यासगट शेत आणि पांदण रस्त्यांच्या सध्याच्या योजनांचा सखोल अभ्यास करेल. विशेषतः नागपूर, अमरावती आणि लातूर जिल्ह्यांत राबवलेल्या योजनांचे विश्लेषण करून त्यात सुधारणा सुचवेल. तसेच योजनांसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष ठेवण्याची गरज, निधी उपलब्धतेचे परिमाण आणि कोणत्या विभागामार्फत योजना राबवावी याबाबत शिफारसी करेल. जमाबंदी आयुक्तांच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही आणि महसूल मंत्र्यांच्या समितीच्या सुचनांचे कायदेशीर परीक्षण करून अहवाल सादर करणे, हे या गटाचे प्रमुख कार्य असेल, अशी माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली.








