Fadanavis said, we are together : फडणवीस म्हणाले, आम्ही दोघं एकत्रच आहोत
Antarwalisaraati : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा जोर चढला असून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताना, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी त्यांना आरक्षणाचं काम करू दिलं नाही, असा हल्लाबोल केला.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी सरकारमध्ये कोणताही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. “एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एक आहोत. शिंदेंनी स्वतःही तसं सांगितलं आहे. कोणी काडी टाकली तरी आमच्यात फूट पडणार नाही. माझे शिंदेंसोबत चांगले संबंध आहेत,” असं फडणवीस म्हणाले.
मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करणार आहेत. “लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन केलं तर सरकार त्यांना रोखणार नाही. मात्र आता गणेशोत्सव सुरू होत आहे, या सणात कुठलाही व्यत्यय येऊ नये, ही आमची अपेक्षा आहे,” असंही फडणवीसांनी सांगितलं.
“आम्ही मुंबईत पोहोचण्याआधी सरकारने मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा उपोषणाला बसणारच,” असा निर्धार मनोज जरांगेंनी व्यक्त केला असून सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
____








