Serious impact on health services in the state : राज्यातील आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम
Pune : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सलग १९ व्या दिवशी सुरू असून, यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होत आहे. क्षयरोग निदान, पोषण पुनर्वसन केंद्रे आणि विशेष नवजात शिशू काळजी विभाग यांसारख्या महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. रुग्णसेवा ठप्प झाल्याने रुग्णांना गंभीर फटका बसत असून, “या परिस्थितीची जबाबदारी कोण घेणार?” असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
संपामुळे राज्यातील ८२ पोषण पुनर्वसन केंद्रांपैकी तब्बल २७ केंद्रांमध्ये सेवा बंद झाली आहे. तसेच, एकूण ६० विशेष नवजात शिशू काळजी विभागांपैकी तब्बल ४१ विभागातील कर्मचारी संपावर आहेत. नंदुरबारमधील अक्कलकुवा, अमरावतीतील धारणी व अचलपूर, तसेच गडचिरोलीतील अहेरी यांसारख्या संवेदनशील भागांमध्ये सेवा ठप्प आहेत. यामुळे संप सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५० हून अधिक बालमृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.
Rohit Pawar : रोहित पवारांचा प्रश्न ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ कुठे आहेत?
दरमहा राज्यात सरासरी १८ हजार क्षयरुग्णांची नोंद केली जाते. मात्र ऑगस्ट महिन्यात फक्त ९ हजार ४९० प्रकरणेच नोंदवली गेली आहेत. यावरून क्षय निदान आणि उपचार प्रक्रियेवर संपाचा तीव्र परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय लसीकरण मोहिमेवरही या संपाचा थेट फटका बसला आहे. राज्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात महिन्याला चार लसीकरण सत्रे आयोजित केली जातात. मात्र, मागील १७ दिवसांत बहुतांश केंद्रांमध्ये लसीकरण झालेले नाही, अशी माहिती संघटनेने दिली आहे.
Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यातील सर्वात मोठी अपडेट !
२२ ऑगस्ट रोजी या प्रश्नावर बैठक घेण्यात आली होती. मात्र, आरोग्य विभागाचे आयुक्त किंवा सचिव अनुपस्थित राहिले आणि केवळ त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतरही आजअखेरपर्यंत बैठकीचे इतिवृत्त देण्यात आलेले नाही. त्यामुळे चर्चेतून कोणताही समाधानकारक निर्णय न झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कर्मचारी संघटनेचे राज्य समन्वयक विजय गायकवाड यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाकडून ठोस आणि कालबद्ध कार्यक्रम मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. त्यांनी जाहीर केले की, १० सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू होईल. या आंदोलनात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कंत्राटी कर्मचारी सहभागी होतील. अंदाजे २५ ते ३० हजार कर्मचारी मुंबईत एकत्र जमून शासन आणि प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन करतील.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी तीव्र होणार असल्याने ग्रामीण भागातील रुग्णसेवा अधिकच विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आधीच बालमृत्यू, क्षयरोग निदान आणि लसीकरणावर मोठा फटका बसलेला असताना संप आणखी वाढल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येणार हे निश्चित आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सरकार यावर कोणती भूमिका घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
___