Nagpur
Chief Minister Fadnavis assured? : मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमका कोणता शब्द दिला?
लोकसभा निवडणूकीच्या ऐन अगोदर काँग्रेसचा हात सोडून शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती उचलणारे राजू पारवे यांचे राजकीय भविष्य काय असेल याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारवे यांना महायुतीत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. विधानसभेत पारवेंना संधी न मिळाल्याने आता त्यांना विधानपरिषदेत जागा देत राजकीय भरपाई होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे राजू पारवेंना आता विधान परिषदेचे वेध लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीत राजू पारवे यांनी उमरेडच्या Umred आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसचा हात सोडला. शिवसेनेचा धनुष्यबाण उचलून रामटेक Ramtek लोकसभेच्या रिंगणात उतरले; पण निवडणुकीत यश आले नाही. काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी बाजी मारली. लोकसभा तर हातून गेली, पण विधानसभेत उमरेडमधून तिकीट मिळेल अशी आशा पारवे यांना होती. त्याबाबत विविध चर्चांना उधाणदेखील आले होते. मात्र दिल्लीशी जवळीक असल्याचा फायदा सुधीर पारवे यांना झाला व अखेरच्या क्षणी त्यांना तिकीट मिळाले.
त्यानंतर राजू पारवे यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली. पण फडणवीस यांनी राजकीय चातुर्य वापरून राजू पारवे यांना शांत केले. त्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायला लावला. आता राजू पारवेंमुळे सुधीर पारवेंचे हात मजबुत होतील, असे सर्वांना वाटले होते. मात्र या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजपमधून इच्छुक असलेले प्रमोद घरडे नाराज झाले. ते अपक्ष लाढले आणि तिसऱ्या क्रमांकाची 49262 मतं घेतली.
भाजपची मतं त्यांनी घेतल्यामुळे निवडणुकीत सुधीर पारवे यांचा पराभव झाला. त्यामुळे आता उमरेडची जागा महायुतीकडून तशी रिकामीच आहे. ही संधी साधत राजू पारवे मतदारसंघात आपणच भविष्यातील दावेदार असल्यासारखे सक्रिय झाले आहेत. स्थानिक विकासाचे प्रश्न, उमरेड एमआयडीसीचा प्रश्न असे मुद्दे ते सरकारदरबारी मांडत आहेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचीदेखील भेट घेतली आहे. स्थानिक कार्यक्रमांतदेखील ते सक्रिय दिसून येत आहेत. आता विधानसभेच्या निवडणूकीला तर पाच वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे पारवे हे विधानपरिषदेचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवूनच सक्रिय झाले आहेत की काय अशा चर्चांना ऊत आला आहे.