Bharat Gogawales cautious reaction to Ramdas Kadams statement : रामदास कदमांच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंची सावध प्रतिक्रिया
Pune : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना, आता शिंदेगटाचे मंत्री भरत गोगावले यांनी सावध भूमिका घेतली आहे. “दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आले का, याची मला काही कल्पना नाही. कोणाच्या मनात काय आहे हे सांगणं अशक्य आहे,” असे गोगावले यांनी स्पष्ट करत रामदास कदमांची थेट पाठराखण टाळली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना भरत गोगावले म्हणाले, “रामदास कदम बोलले आहेत, त्यावर काही लोक उत्तर देत आहेत. आता ते त्यावेळी तिथे होते, त्यांनी काही पाहिलं का, याचं उत्तर तेच देत आहेत. आम्ही यावर अधिक काही बोलणं योग्य ठरणार नाही. पाहूया, आगे आगे होता है क्या!” असं म्हणत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य न करता मौन बाळगणं पसंत केलं.
Toxic cough syrup : चिमुकल्यांना विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला बेड्या
गोगावले पुढे म्हणाले, “बाळासाहेबांचे ठसे घेतले याची आम्हाला काही कल्पना नाही. ते बोलले की मी तिथे सात-आठ दिवस होतो, त्यामुळे त्यांना काही कळलं असेल ते त्यांना माहिती. पण त्यावर आम्ही प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही.” त्यांच्या या प्रतिक्रियेने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
याचवेळी त्यांनी रायगडच्या पालकमंत्री तिढ्याबाबतही भाष्य केले. “रायगडच्या पालकमंत्री तिढा सोडवण्यात दिरंगाई होत आहे, यात कोणतंही दुमत नाही. पालकमंत्री पदाची माळ माझ्या गळ्यात कधी पडते, याची मीही वाट पाहतोय,” असे म्हणत त्यांनी आपल्याच सरकारकडे लक्ष वेधले.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी केलेले विधान अद्याप चर्चेत आहे. कदम यांनी मेळाव्यात म्हटले होते की, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवला होता. याचं कारण काय होतं, हे एकनाथ शिंदेंनी शोधावं.” त्यांनी पुढे दावा केला की, बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच त्यांना ही माहिती दिली. तसेच, “बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेतले गेले, मात्र ते कशासाठी हे आम्हाला समजले नाही,” असंही कदम म्हणाले होते.
या विधानानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये आणि ठाकरे घराण्याभोवती राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी घेतलेली संयमी भूमिका आणि त्यांचे “कोणाच्या मनात काय आहे ते कोणी सांगू शकत नाही” हे वक्तव्य, राजकीय वर्तुळात सूचक प्रतिक्रिया म्हणून पाहिले जात आहे.








