मित्रपक्षाचा प्रस्ताव आला, तर आम्ही चर्चेला तयार : If ally proposes, we ready for discussion.
Mumbai: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली असून, यावरून राज्यातील राजकीय हालचाली चांगल्याच वाढल्या आहेत. येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीची शक्यता वर्तवल्याने महाविकास आघाडीत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, “मित्रपक्षाचा प्रस्ताव आला, तर आम्ही चर्चेला तयार आहोत.” यावरून काँग्रेस स्थानिक निवडणुकांमध्ये नव्या समीकरणांची दारे उघडी ठेवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेसने हायकमांडशी चर्चा केली आहे आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. “मुंबईची तिजोरी खाली गेली आहे, भ्रष्टाचाराचे प्रकार वाढले आहेत, आणि शहरातील मूलभूत समस्या आजही सुटलेल्या नाहीत. या सगळ्या प्रश्नांवर आम्ही जनतेसमोर जाणार आहोत,” असे ते म्हणाले.
Municipal Corporation Election : नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी सज्ज
त्यांनी पुढे म्हटले की, “मुंबई महापालिका ही केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक आहे. मुंबईच्या विकास आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस ठोस भूमिका घेणार आहे.”
वडेट्टीवार यांनी भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटावर टीका करताना म्हटले की, “हे तीन पक्ष सत्तेत असूनही वेगळे लढणार आहेत. जर त्यांचे विभाजन होत नसेल, तर आमच्या विभाजनाची चिंता का? आम्ही नेहमी स्वबळावर लढलो आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “शरद पवारांच्या पक्षाकडून जर चर्चेचा प्रस्ताव आला, तर आम्ही तो विचारात घेऊ. मतांचे विभाजन होईल का नाही, याची आम्हाला चिंता नाही, कारण आमचे उद्दिष्ट जनतेचे प्रश्न सोडवणे आहे.”
वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, “ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे.” अनेक कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवर नेत्यांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. “मनसेसोबत जर आघाडीचा प्रस्ताव आला, तर तो मुंबईतील आमच्या स्थानिक नेत्यांकडे पाठवू. त्यांच्या संमतीनंतर पुढील निर्णय घेतला जाईल,” असे ते म्हणाले.
Amravati Police : गृहराज्यमंत्री, क्रीडा राज्यमंत्र्यांच्या बंदोबस्ताला दांडी!
राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसची संभाव्य आघाडी स्थानिक पातळीवर सत्तांतराचे चित्र तयार करू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
_____
—








