jitendranath-maharaj-invirat-hindu-sammelan-dharni-melghat : जितेंद्रनाथ महाराजांचे परखड मत, मेळघाटात विराट हिंदू संमेलन
Amravati “देव आहे तर देश आहे आणि देश असेल तरच धर्म सुरक्षित राहील. जो व्यक्ती धर्माची खरी पूजा-अर्चना करतो, तोच खरा राष्ट्रप्रेमी असतो,” असे परखड प्रतिपादन श्रीनाथ पीठाचे स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त धारणी येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. या संमेलनाने धार्मिक एकात्मता, सांस्कृतिक मूल्ये आणि राष्ट्रनिष्ठेचा ठळक संदेश दिला.
या प्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मेळघाटचे आमदार केवलराम काळे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनील चौथमल आणि माजी आमदार राजकुमार पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंचावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवी पटेल, हरेराम मालवीय, पं. सूर्यप्रकाश मिश्रा तसेच राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत बौद्धिक प्रमुख आरती तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवी पटेल यांनी आदिवासी समाजाविषयी भूमिका मांडताना सांगितले की, “आदिवासी समाज हा प्राचीन काळापासून जल, जंगल आणि जमीन यांचे रक्षण करणारा आहे. सांस्कृतिक परंपरांचे जतन करणारा हा समाज मूळचा हिंदूच आहे.”
कलश यात्रेने वेधले लक्ष
संमेलनाच्या पूर्वसंध्येला राम मंदिर ते रंगभवन मैदान दरम्यान भव्य कलश यात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेषातील महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “जय श्रीराम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी चोख नियोजन केले होते. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांनी ‘राम खिचडी’चा लाभ घेतला. एकूणच या विराट हिंदू संमेलनातून मेळघाटात सामाजिक ऐक्य, धार्मिक चेतना आणि राष्ट्रभक्तीचा नवा जागर अनुभवास आला.








