Vijay-Wadettiwar-says-mahayuti-government-budget-is-just-number-game : महायुती सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली, पुणे-मुंबई केंद्रित अर्थसंकल्प असल्याचा आरोप
Nagpur मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा होता. यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. महाराष्ट्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य २०४७ मध्ये होईल, या शब्दांत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपरोधिक टीका केली.
हा अर्थसंकल्प संपूर्ण महाराष्ट्राचा नसून केवळ मुंबई आणि शहराचा वाटतो. पुणे, ठाणे आणि मुंबईतील प्रकल्पांवरच सर्व भर देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी, विशेषतः नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यांसाठी या बजेटमध्ये कोणतीही ठोस तरतूद नाही. सिंचन, शिक्षण आणि आरोग्य याबाबत स्पष्टता नाही. २०१४ मध्ये जेव्हा काँग्रेसने सत्ता सोडली, तेव्हा राज्यावर २ लाख ९० हजार कोटींचे कर्ज होते. आज कर्ज वाढले आहे. राज्य भिकारी होण्याच्या मार्गावर असून आर्थिक ताळमेळ पूर्णपणे कोलमडला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा याही वेळी करण्यात आलेली नाही. मागील वर्षीच्या घोषणांची अंमलबजावणी अद्याप कागदावरच असून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. या अर्थसंकल्पातून केवळ कंत्राटदार आणि उद्योगपतींची भरभराट होणार आहे. प्रचंड कमिशन खाऊन सरकार स्वतःला मजबूत करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.








